(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रत्नागिरीच्या अत्याधुनिक रेल्वेस्थानकाला सलग दुसऱ्या वर्षी धक्का दिला आहे. नव्या सुशोभीकरणाच्या छतातून पुन्हा एकदा पाणी गळू लागल्याने कोटींच्या खर्चावरून प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इतक्या मोठ्या निधी खर्चूनही कामाचा दर्जा किती सुमार आहे, याची प्रचिती पुन्हा मिळत आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये आलेल्या वादळी पावसात रेल्वेस्थानकाच्या पश्चिम प्रवेशद्वारावर बसवलेले छत आणि क्लॅडिंग उडून गेले होते. त्या वेळी सुमारे १५ ते २० चौरस फूट भागाचे नुकसान झाले. सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच हे नुकसान झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत पहिल्यांदाच शंका निर्माण झाली होती. हे संपूर्ण काम राज्य सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते.
आता पुन्हा एकदा सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या दर्शनी भागातील छत आणि क्लॅडिंगमधून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, रेल्वेस्थानकाची प्रतिमा मलीन होत आहे. ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात येताच तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. छताचे वलेंडिंग निसटू नये आणि गळती थांबवण्यासाठी यंत्रणांची मोठी धावपळ सुरू आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या वर्षभरापूर्वी या नव्या स्वरूपातील रेल्वेस्थानकाचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले होते. त्यावेळी कोटींचा निधी खर्चून नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र अल्पावधीतच उघडकीस आलेल्या दोषांमुळे हा खर्च अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. “सरकारी काम आणि वेळेवर परिणाम” या म्हणीला दुजोरा देत, रत्नागिरी रेल्वेस्थानकाचे ‘अत्याधुनिक’ रूप पुन्हा एकदा पावसात भिजले आहे.