(लांजा)
मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे लांज्यात आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे अनेक ग्राहक ओलेचिंब झाले, तर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.
सोमवारी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने मंगळवारीही पावसाचा जोर टिकून होता. शहरातील राम पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यांमुळे नेवरेकर यांच्या घराच्या परिसरात पाणी साचले. त्यांच्या अंगणात पुराचे पाणी घुसल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने लांजा बसस्थानक ते कोत्रे हॉटेल आणि श्रीराम पुलाजवळील मार्ग एकेरी करण्यात आला होता. परिणामी, दुपारपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना सतत पावसात धावपळ करावी लागली.
पावसामुळे संपूर्ण शहरात जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.