(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्याची साईड पट्टी भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर हे चर नीटपणे बुजवण्यात न आल्याने सदर रस्ता धोकादायक बनला आहे. या दुर्दशेमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या कामादरम्यान संबंधित ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना पावसाळ्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य धोका आणि गैरसोयीबाबत वारंवार सूचित करण्यात आले होते. तरीदेखील साईड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, चांगल्या रस्त्याची अक्षरशः वाताहत झाली आहे.
या संदर्भात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते संजय नाटेकर यांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनं या उघड्या चरात अडकत असून, अपघातासारख्या घटनाही घडत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांनी या निष्काळजी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला असून, दोषी ठेकेदार आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.