पाकिस्तानसाठी गुप्तचर माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिची चौकशी वेगात सुरु आहे. ज्योतीने आपल्या वैयक्तिक डायरीत पाकिस्तानमधील अनुभव आणि तिथल्या लोकांच्या आदरातिथ्याचे भरभरून कौतुक केले आहे. ही डायरी आता तपासात महत्त्वाची ठरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती नियमितपणे तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचे अनुभव डायरीत लिहून ठेवत असे. २०२४ मध्ये पाकिस्तानला १० दिवसांची भेट देऊन परतल्यावर तिने पाकिस्तानविषयी दोन पाने लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने पाकिस्तानी लोकांनी दिलेल्या प्रेमाची आणि आदराची आठवण जपली असून, भारत-पाक संबंधांबाबत आपल्या भावना स्पष्टपणे मांडल्या आहेत.
तिने लिहिले आहे:
“माझी १० दिवसांची पाकिस्तान भेट पूर्ण केल्यानंतर, आज मी भारतात परतली आहे. सीमांमधील अंतर किती काळ राहील, हे माहित नाही, पण मनातील द्वेष पुसून टाका. आपण सर्व एकाच भूमीचे, एकाच मातीचे आहोत.” तसेच, लाहोरच्या भेटीसाठी दोन दिवस अपुरे वाटले, असेही तिने नमूद केले.
ज्योतीने आपल्या डायरीत १९४७ च्या फाळणीदरम्यान पाकिस्तानात स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबांसाठी मंदिर आणि गुरुद्वारे खुले करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तान सरकारने तेथील मंदिरांचे संरक्षण करावे, तसेच अधिकाधिक भारतीय हिंदूंनी त्यांच्या पूर्वजांच्या भूमीला भेट द्यावी, असे मतही व्यक्त केलीकेले आहे. तिने यात असे म्हटले आहे की, तिचा हा अनुभव शब्दांच्या पलीकडला होता. यावरून असे दिसून येते की ज्योती केवळ पर्यटक म्हणून नाही तर भावनिक मोहिमेवरही पाकिस्तानला गेली होती.
मोबाईल फोनमधून उघड होऊ शकते मोठे सत्य
ज्योती सध्या ५ दिवसांच्या पोलिस कोठडीत असून तिची चौकशी एनआयए, आयबी आणि हरियाणा पोलीस करत आहेत. चौकशीत दररोज नवीन खुलासे होत असून, पोलिसांच्या मते ज्योती तपासातून वळवळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
तीने पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या आयएसआय एजंट दानिशशी असलेले संबंध नाकारले आहेत. मात्र, पोलिसांचा आरोप आहे की तिने व्हॉट्सअॅपवरील दानिशसोबतचे चॅट्स डिलीट केले आहेत. या संभाषणांतून गुप्तचर माहिती दिल्याचे पुरावे मिळू शकतात, असा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे तिचा मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.