(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पारेख पेट्रोल पंपापासून अगदी जवळ अंतरावर भलेमोठे वडाचे वृक्ष जमीनदोस्त झाले. यावेळी महावितरणचे अकरा किलोहोल्ट विजवाहिन्या ओढण्यात आलेले सहा खांब वाकल्याने व विद्युतभारीत वाहिन्या तुटून पडल्याने पारेख पेट्रोलपंप परिसर, मापारी मोहल्ला, कोंड असुर्डे, मौजे असुर्डे या गावातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. महामार्ग ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा सर्व प्रकार झाला असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून संगमेश्वर पारेख पेट्रोल पंपाजवळ महामार्गा लगत असलेल्या भल्या मोठ्या वडाच्या वृक्षाचे ठिकाणची माती खोदाई करून त्या वृक्षाचे जमिनीत पसरलेली खोडे जेसीबी लच्या साहाय्याने तोडून ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी कापली. यामुळे हा वृक्ष अधांतरी उभा होता. त्यामुळे हा वृक्ष केव्हाही जमीनदोस्त होईल आणि मोठी दुर्घटना होऊ शकेल याची कल्पना त्याचवेळी ठेकेदार कंपनीच्या कामगारांना तसेच त्यांच्या वरिष्ठांना देण्यात आली होती. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक लोकांच्या सूचनेकडे पाठ फिरवली. दोन दिवस अवकाळी पावसाचा हैदोस सुरु असून हा वृक्ष कोसळला तर, या विचारात आणि भीतीच्या वातावरणात लोक वावरत होते. मात्र याचे कोणतेच सोयरसुतक ठेकेदार कंपनीला नव्हते. ते जणू काही दुर्घटना होण्याच्या प्रतीक्षेतच होते.
सा. बां. विभाग कार्यकारी अभियंतांना साद
मंगळवार पासून संगमेश्वर भागात जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान सुरु असून महामार्गाच्या अगदी लगत असलेल्या अधांतरी उभ्या असलेल्या वृक्षापासून संभाव्य धोका आहे. आणि तसे झाल्यास महावितरण ची तर हानी होईलच, मात्र महामार्गावरील वाहानांवर हा वृक्ष किंवा विजवाहिन्या पडल्यास न भरून येणारी हानी होऊ शकेल याची माहिती सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता यांना मोबाईलवरून बुधवारी सकाळी देण्यात आली. त्यांनी आज (गुरुवार) ते वृक्ष तोडण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र ठेकेदारचा मनमानी कारभार निसर्गालाही चव्हाट्यावर आणायचा होता की काय, म्हणूनच विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह थैमान घालताच तो वृक्ष जोरदार आवाज करत अखेर जमिनीवर आडवा झाला. यावेळी त्याने अकरा किलोहोल्ट विजवाहिन्यासहित सहा विद्युत खांबांना सुद्धा जमिनीवर नतमस्तक केले, आणि लोकांच्या मनातील अंदाज ठरला.
मात्र हा सर्वप्रकार घडत असताना सुदैवाने महामार्गावर वाहनांची तसेच आजूबाजूला मानवी वर्दळ नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना वा कोणतीही जीवितहानी झाली नाही. महावितरण विभागाला मात्र याचा आर्थिक फटका बसला आहे. तर संगमेश्वर मधील काही भागासह कोंड असुर्डे व मौजे असुर्डे गावातील लोकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर विजेअभावी व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला लागला.
महामार्ग ठेकेदाराने जनतेच्या जीवाशी खेळण्याचा ठेका घेतला आहे का?
येथील महामार्ग ठेकेदार कंपनीने संगमेश्वरवासियांच्या जीवाशी जीवघेणा खेळ करण्याचा प्रकार नेहमीच करत असल्याने स्थानिक कमालीचे संतप्त झाली असून, या विरोधात लवकरच आक्रमक पवित्रा घेणार असल्याबाबतच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.