(मुंबई)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रियजन गमावलेल्या जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीयांनी राजकीय नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे – “धर्म विचारून मारलं का, हे विचारणाऱ्यांनी आमच्या समोर यावं, आम्ही उत्तर देण्यासाठी तयार आहोत.” या कुटुंबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या दुखद अनुभवांची साक्ष दिली आणि विरोधकांच्या वक्तव्यावर थेट प्रहार केला.
“बंदुकीच्या मागील बाजूने मारहाण करून हिंदू-मुस्लीम वेगळे केले”
गनबोटे कुटुंबीयांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी आधी लोकांना धर्म विचारून वेगळं केलं. हिंदू असल्याचं कळताच, त्यांना अमानुषपणे मारलं. “ते आम्हाला विचारत होते – हिंदू आहात का? आणि नंतर बंदुकीच्या मागच्या बाजूने मारहाण करत होते,” असं त्या म्हणाल्या. या घटनेत २६ लोकांचा बळी गेला. मृतांमध्ये गनबोटे आणि जगदाळे कुटुंबीयांचे सदस्यही होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, “जर धर्म विचारून मारलं नाही, असं वाटत असेल, तर राजकारण्यांनी आमच्या समोर यावं. आम्ही आणि आमची लहान मुलं साक्षी आहेत.” हल्ल्यात पती गमावलेल्या एका महिलेनं भावना व्यक्त करताना सांगितलं, “माझ्या नवऱ्याने ‘अल्लाहू अकबर’ किंवा अजाण म्हणणं नाकारलं, म्हणून त्याला गोळ्या घालण्यात आल्या. आज माझ्या मस्तकावरील टिकलीही त्यांच्यामुळे काढावी लागली.”
“ते म्हणाले होते – मी ५० अतिरेकी मारून मरेन!”
“माझ्या पतींचं एक स्वप्न होतं – भारतासाठी जीव देताना कमीत कमी ५०-१०० दहशतवाद्यांना घेऊन मरणं. आज त्या बलिदानाचं चीज झालं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्ल्यानंतर १०० दहशतवाद्यांना मारून बदला घेतला. हेच आमच्यासाठी समाधान आहे.” असं त्या म्हणाल्या.
विरोधकांवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, “२६/११ चा आजवर कोणी बदला घेतला का? पण मोदी सरकारने घेतला. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते प्रत्येक हल्ल्याचं उत्तर देतीलच. तुम्ही २६ मारलेत, तर तुमचे एक हजार मरतील. पाकिस्तानने हे लक्षात ठेवावं.”
“आता हिंदूंनी एकत्र यावं; मोदी सरकार ही काळाची गरज”
“हल्लेखोरांनी आम्हाला सांगितलं – हे सगळं मोदींना जाऊन सांगा. आम्ही सांगितलं आणि मोदींनी उत्तरही दिलं,” असं सांगत त्यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला – “हिंदूंनी आता एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. मोदींसारखे निर्णय कोणीही घेऊ शकत नाहीत. त्यामुळे हे मोदी सरकारवर कायमस्वरूपी टिकणं ही काळाची गरज आहे.”
पहलगामच्या हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांच्या या थेट भावना राजकीय चर्चेला उत्तर आहेत. यातून स्पष्ट होते की हल्ल्याचा उद्देश केवळ हिंसा नव्हता, तर धार्मिक विघटनाचाही होता. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी आपली वक्तव्ये अधिक जबाबदारीने द्यावीत, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.