(संगमेश्वर / प्रतिनिधी)
दारी थांबलेली गरीबी, डोक्यावर वडिलांचे छत्र हरवलेले आणि पाठिशी फक्त आईचा जिद्दीचा हात – अशा संघर्षमय परिस्थितीतून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील अत्यंत कठीण परीक्षेत राज्यात १८ वा क्रमांक पटकावणाऱ्या रोहन सखाराम शिगवण याने केवळ स्वतःचेच नव्हे, तर आपल्या आईच्या प्रत्येक अश्रूला यशाचे तेजपुंज रूप दिले आहे. संगमेश्वर तालुक्यातील धामापूर भडवळेवाडी येथील रोहनची ही कहाणी केवळ परीक्षेतील यशाची नसून, ती आहे एका आईच्या अथक कष्टांची, त्यागाची आणि मुलाच्या जिद्दीची प्रेरणादायक गाथा.
रोहन अवघा आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. घरात कोणीही शिकलेले नव्हते. वडिलांच्या उपचारासाठी घेतलेले कर्ज, तीन लहान मुलं आणि मुंबईतील एका दहा बाय दहा चाळीतील उभा संसार – या साऱ्यांनी संगीता शिगवण यांच्या जीवनाला चहुबाजूंनी कोंडले होते. पण परिस्थितीशी दोन हात करत, घरकाम, भांडी-धुणी यांसारखी कामं करून त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण थांबू दिलं नाही.
रोहनने मुंबईत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण करून त्याने सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी मिळवली. काही काळ खासगी क्षेत्रात नोकरी केल्यानंतर, कोविड काळात आलेल्या अस्थिरतेने त्याला स्पर्धा परीक्षेकडे वळवले. पत्नी भक्तीने दिलेल्या साथीतून आणि आईच्या आठवणींच्या प्रेरणेतून रोहनने अभ्यासाची कास धरली. पहिल्याच प्रयत्नात अपयश आलं तरी खचून न जाता त्याने अधिक जोमाने तयारी सुरू ठेवली. पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतरदेखील एमपीएससीचा ध्यास सोडला नाही.
नोकरी, कुटुंब आणि अभ्यास या तिन्ही गोष्टी सांभाळत रोहनने एमपीएससीची पात्रता, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा सर्व टप्प्यांत यश मिळवत राज्यात १८ वा क्रमांक पटकावला. हे यश मिळवताना त्याला आई संगीता, पत्नी भक्ती, बहीण, भाऊ आणि मित्रांचे मोलाचे सहकार्य लाभले. आईच्या अश्रूंना जर यशाची किनार मिळाली, तर ते सोन्यासारखे झळकते, हे या रोहनच्या प्रवासातून अधोरेखित होत आहे.
यशस्वी होण्यासाठी रोहनचा मंत्र
‘आईच्या कष्टाशिवाय हे शक्य नव्हते. तिचा त्याग, तिची जिद्द हीच माझी ऊर्जा होती,’ असे तो नम्रतेने सांगतो. “परिस्थिती कितीही वाईट असो, जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल, तर नियतीही तुमची साथ देते. कोणतेही यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत, योग्य नियोजन आणि सातत्य आवश्यक आहे,” असा संदेश रोहनने नवतरुणांना दिला.