(रत्नागिरी / प्रतिनिधी)
सापाचे नाव काढताच अंगावर काटा उभा राहतो, त्यात अजस्र अजगर म्हटला की पाहणाऱ्याची बोबडीच वळते. शहरातील चर्मालय चाररस्ता परिसरात विमानतळ मार्गावरील भर रस्त्यावर असाच एका अजस्र अजगराची एन्ट्री झाल्याने गोंधळ उडाला. मात्र, सर्पमित्रांच्या पुढाकाराने त्याला ताब्यात घेऊन त्याची जंगलात सुखरूप सुटका करण्यात यश आले.
उन्हाळ्याची तीव्रता शिगेला पोहोचली असून, पावसाळ्याची चाहूल लागणार आहे. अशा काळात साप बाहेर निघण्यास सुरुवात होते. शहरातील चर्मालय चाररस्ता परिसरातील बुधवारी (दिनांक १५ मे २०२५) संध्याकाळच्या सुमारास वाहनचालकांना एका आठ फूट लांब अजगराचे दर्शन झाले. भररस्त्यावर सरकत असलेला हा भला मोठा अजगर पाहून नागरिकांसह वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली.
या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र सिद्धार्थ सावंत (रा. थिबा पॅलेस) काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. रस्त्याच्या कडेला एका झाडामध्ये शांत स्थितीत अजगर थांबला होता. दरम्यान आजूबाजूला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सावंत यांनी कोणतीही घाईगडबड न करता, शांतपणे आणि अत्यंत कौशल्याने अजगराला पकडले. विशेष म्हणजे, अजगराला कोणतीही इजा न होता त्याचे रक्षण करण्यात त्यांना यश आले.
यानंतर सावंत यांनी आपल्या वाहनाच्या सहाय्याने अजगराला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या सोडून दिले. त्यांनी दाखवलेली तत्परता, धैर्य आणि प्राणीमित्र वृत्ती याचे अनेकांनी कौतुक केले आहे. सर्पमित्र सिद्धार्थ सावंत यांच्यामुळे एक अनर्थ टळला आणि अजगराला नवजीवन मिळाले, हे निश्चितच उल्लेखनीय आहे.