(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात परदेशी नागरिक असूनही बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिने साधा कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक दिवस अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 30/2025 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भा.दं.वि. कलम 318, 336(3) तसेच पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चा नियम 3(ए), 6(ए) आणि विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14(अ) व 7 नुसार कारवाई करण्यात आली. आरोपी महिलेचे नाव सलमा खातुन बिलाल मुल्ला उर्फ सलमा राहिल भोंबल ( वय 30 वर्षे, रा. प्लॅट नं. ए-9, ए विंग, सफा टॉवर्स, साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे आहे. तिच्यावर भारतात बेकायदेशीर प्रवेश करून वास्तव्य केल्याचा आरोप होता. या प्रकरणाचा तपास पो.उ.नि. शितल पाटील यांनी केला असून, न्यायालयात सरकारी पक्षातर्फे पैरवी अंमलदार मपोहवा 1424 साळवी व पोहवा 1546 पाटील यांनी काम पाहिले. प्रकरणावर सुनावणी करताना मा. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. गोसावी यांनी दोष सिद्ध झाल्याचे स्पष्ट करत शिक्षा सुनावली.
प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. श्री. शिवरकर यांनी संपूर्ण गुन्ह्याचे समन्वय काम पाहिले. शहरात परप्रांतीय तसेच विदेशी नागरिकांवर पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येत असून, अशा प्रकरणांवर शासन आणि यंत्रणा सजग आहे, हे या कारवाईतून अधोरेखित होते.