(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ७९० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनाची सांगता झाली आहे. शासनाच्या आदेशानंतर हे कर्मचारी आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार आहेत.
उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद कार्यालयांमधील कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांचा या आंदोलनात सक्रीय सहभाग होता. कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करणे, शासकीय पदांप्रमाणे वेतन व सेवा हक्क बहाल करावेत, या मुख्य मागण्यांसाठी त्यांनी सामूहिक रजा घेतली होती.
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. रुग्णसेवा खोळंबल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच इतर कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताणही वाढला होता. दरम्यान, उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्य शासनाने तातडीने आदेश देत सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. त्या आदेशाचे पालन करत सर्व कर्मचारी आता कामावर परतणार आहेत.
कायमस्वरूपी तोडगा अद्यापही निघालेला नाही….
कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. याच समस्येमुळे यापूर्वीदेखील त्यांनी आंदोलनाचे हत्यार उचलले होते. मात्र, कायमस्वरूपी तोडगा अद्यापही निघालेला नाही. शासनाने यावेळी कर्मचाऱ्यांचे मागणे गांभीर्याने घेत त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी सर्वस्तरांतून मागणी होत आहे.