( देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि भूगोलशास्त्र विभागप्रमुख डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई विद्यापीठाने आस्था कपूर यांना विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) नुकतीच जाहीर केली. आस्था कपूर यांनी “भौगोलिक दृष्टिकोनातून पाण्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक नमुना अभ्यास” या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केली. आस्था कपूर या मूळ दिल्लीच्या रहिवासी असून, त्यांनी महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली या स्मार्ट शहराच्या पाण्याच्या विविध पैलूंवर आपले संशोधन केले आहे. त्यांनी आपल्या संशोधनात प्राथमिक माहिती स्त्रोत, दुय्यम माहिती स्त्रोत आणि उपग्रह प्रतिमा यांचा उपयोग माहितीच्या संकलनासाठी केला असून, एस. पी. एस. एस. भौगोलिक माहिती प्रणाली आणि संगणक संहितांचा वापर माहितीचे विश्लेषण करण्यासाठी केला आहे.
आस्था कपूर यांनी आपल्या संशोधनात भूमी उपयोजन आणि भूमी आवरण, पाण्याची मागणी आणि पुरवठा, पाण्याची गुणवत्ता आणि त्याचे अभिक्षेत्रीय वितरण, पाण्याचे वितरण आणि पाण्याशी संबंधित समस्यांविषयी लोकांचे दृष्टिकोन, वॉटर फुट प्रिंट, पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापन आणि उपयोगासाठी उपाय योजना इत्यादी विविध विषयांना अनुसरून आपल्या प्रबंधाची मांडणी केली आहे. त्यांनी मांडणी केलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वॉटर फूट प्रिंट हे एक महत्त्वाचे योगदान असल्याचे अभ्यासकांनी व संशोधकांनी मत व्यक्त केले आहे. या संशोधनाचा उपयोग धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला उपयुक्त ठरेल, असे विधान बहिस्थ परीक्षकांनी तोंडी परीक्षेच्यावेळी व्यक्त केले होते.
महाविद्यालयात भूगोलशास्त्र विषयाचे संशोधन केंद्र असून डॉ. सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ६ विद्यार्थी नागरी समस्या आणि नगर नियोजन, पुनर्निर्मित ऊर्जा, दक्षिण कोकणातील सामाजिक समस्या आणि राजकारणातील महिलांचा सहभाग या वेगवेगळ्या विषयावर आपले संशोधन कार्य करत आहेत. डॉ. पाटील यांनी महाविद्यालयात भूगोलशास्त्र विषयाच्या संशोधनाकरिता आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच सदर संशोधनाकरिता आवश्यक सहकार्य केल्याबद्दल डॉ. संजुक्ता सत्तार, डॉ. दिपाली गडकरी, डॉ. सवितस्मिता चव्हाण, डॉ. भीमराव सोनुले, डॉ. राजाराम पाटील आणि अन्य मान्यवरांचे तसेच भूगोलप्रेमींचे आभार मानले आहेत. महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागाच्या इतिहासात पहिल्या विद्यावाचस्पती पदवीचा मान डॉ. आस्था कपूर यांनी प्राप्त केल्याबद्दल आणि मार्गदर्शक डॉ. सरदार पाटील यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर आणि सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.