(नवी दिल्ली)
‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांना संबोधित करणार आहेत. भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर मोदींचं हे देशातील जनतेसाठी पहिलं भाषण असणार आहे, त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या भाषणाकडे लागले आहे. ऑपरेशननंतर संरक्षण आणि परराष्ट्र विभागाने पत्रकार परिषद घेतली असली तरी पंतप्रधान मोदींनी अद्याप अधिकृत वक्तव्य केलेले नव्हते. आजच्या संबोधनातून पंतप्रधान मोदी देशाला पुढील धोरण, शांतीप्रक्रिया किंवा सुरक्षा उपाययोजनांबाबत महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ची पार्श्वभूमी
७ मे रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी तळांवर लक्ष्य करून मोठी कारवाई केली होती. ही कारवाई जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आली. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता.
भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा
भारताने केवळ दहशतवादी तळ आणि संबंधित पाकिस्तानी लष्करी संरचना लक्ष्य केल्यामुळे अनेक देशांनी भारताच्या संयमित आणि उद्दिष्टपूर्तिकारक कारवाईचे समर्थन केले. परिणामी, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पाठिंबा मिळाला आहे. ही कारवाई पूर्णपणे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली पार पडली.
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले केले. या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यानंतर पाकिस्तान लष्कराने हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांना भारतीय लष्कराने प्रत्युत्तर दिले. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करत युद्धविरामची घोषणा केली. पण, त्याच दिवशी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला होता. यामुळे भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. रम्यान, पहलगाम हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तत्काळ दौरा रद्द करून भारतात परत येत उच्चस्तरीय बैठका घेतल्या आणि लष्करप्रमुखांसह धोरण आखली होती.