(रत्नागिरी)
सर्वोदय छत्रालय हे ऊर्जा केंद्र आहे. त्यामुळे वर्षातून एकदा सर्व माजी छात्रांनी मेळाव्याला आवर्जून यावे. असाच प्रतिवर्षी मेळावा होत राहावा. यातून सर्वानाच आनंद मिळतो. छात्रालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. त्यामुळे कोणाच्याही चेहेऱ्यावर असा कंटाळवाणेपणाचा भाव नाही. नकळत टॉनिक मिळतं, असे प्रतिपादन श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते यांनी केले.
सर्वोदय छात्रालयात रविवारी विसावा छात्र मित्र मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी सर्वोदय मासिक व्याख्यानमाला चालते. चांगले वक्ते आणून रत्नागिरीकरांसाठी ही व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी काही रक्कम ट्रस्टकडे दिली आहे. मी छात्रालयातून चांगले संस्कार, शिक्षण घेतले. आता मी इतरांना मदतीचा हात देईन म्हणजे सर्वोदय होईल. आपले माजी विद्यार्थी म्हणजे एक प्रकारचे सर्वोदय छात्रालयच आहेत.
यमुनाबाई खेर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संदीप ढवळ यांनी सांगितले की, सध्या येथे 28 विद्यार्थी राहत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ऑगस्टमध्ये बाळासाहेब खेर आदर्श छात्र पुरस्कार दिला जातो. सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार दरवर्षी दिला जातो. संस्थेचे अनेक उपक्रम पुढील काही वर्षात राबविण्यात येणार आहेत. वर्षभरात छात्रालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
सर्व छात्रांनी आपला परिचय करून दिला. छात्रालयात प्रवेश मिळाला म्हणून आणि येथील प्रार्थना, व्यायाम, अभ्यास व मदतीच्या संस्कारांमुळेच आम्ही मोठे झालो. गीते सरांनी दिलेल्या संस्कार शिदोरीमुळे घडलो, असे आवर्जून सांगितले.
व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके यांनी सांगितले की, १९४९ पासून आजपर्यंत छात्रालयातून 1600 विद्यार्थी शिकून गेले. यातील किमान एक हजार जणांशी संपर्क करायचा आहे. त्याद्वारे माजी विद्यार्थी मंडळ स्थापन करायचे आहे. त्यानंतर निवडक १५ जणांची समिती गठित करण्यात आली.
या वेळी मंचावर सदस्य बीना कळंबटे, माजी विद्यार्थी प्रतिनिधी दयानंद परवडी आदी उपस्थित होते. रघुवीर शेलार यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग पेठे यांनी आभार मानले.
छात्र मित्र समिती
अध्यक्ष – अरुण जाधव, कार्याध्यक्ष रघुवीर शेलार, सचिव दयानंद परवडी, सहसचिव दिपक सावंत, खजिनदार प्रकाश कळंबटे, सदस्य – नंदकुमार डिंगणकर, ॲड. सचिन बेर्डे, रघुनाथ घाणेकर, विश्वास जाधव, जयदीप कांबळे, प्रा.डॉ. प्रकाश मसुरकर, नंदकुमार शिवगण, डॉ. श्रीपाद कोदारे, कमलाकर हेदवकर, तुकाराम धातकर, ॲड. मंदार बंडबे, दिलीप बापट, धीरज धातकर.