( रत्नागिरी /प्रतिनिधी )
आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळासाठी भाडेवाढ एकप्रकारचा ‘जीवनाविष्कार’ ठरला आहे. २५ जानेवारीपासून लागू झालेल्या १४.९५ टक्के भाडेवाढीमुळे रत्नागिरी एसटी आगाराच्या उत्पन्नात रोज तब्बल दीड ते दोन लाख रुपयांची भर पडत आहे. मागील तीन महिन्यांत आगाराने सुमारे १ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेली ‘लालपरी’ अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींमध्ये गुरफटलेली आहे. चेसिस, टायर आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महामंडळाला आर्थिक फटका बसला. कार्गो सेवा, खासगीकरण यांसारखे पर्यायही पुरेसे फायदेशीर ठरले नाहीत. अखेर महामंडळाने तिकीट दरात १४.९५ टक्के भाडेवाढ करत प्रवाशांच्या खिशावर टाकलेली ही ‘कात्री’, आता त्यांच्या उत्पन्नवाढीचे मुख्य साधन ठरली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ डेपो मिळून पूर्वी रोज सुमारे ९ लाखांचे उत्पन्न मिळत होते. भाडेवाढीनंतर त्यात लक्षणीय वाढ होऊन आता दररोज ११ लाखांचे उत्पन्न होत आहे. जवळच्या प्रवासासाठी १० ते २५ रुपये, तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ५० ते १५० रुपयांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची नाराजी व्यक्त होत असली, तरी आर्थिकदृष्ट्या एसटीची वाटचाल सध्या फायदेशीर ठरत आहे.
प्रवाशांची नाराजी कायम, पण भारमान टिकून
भाडेवाढीमुळे प्रवाशांत नाराजीचा सूर आहे. काही संघटनांनी आंदोलनंही केली, परंतु महामंडळाने भाडेवाढ कायम ठेवत आपली भूमिका ठामपणे स्पष्ट केली. आश्चर्य म्हणजे, या भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत फारसा फरक पडलेला नाही. सेवा सुधारणा व विविध योजनांमुळे प्रवासी भारमान अद्यापही स्थिर असल्याचे दिसून येते.
‘लालपरी’ पुन्हा ट्रॅकवर?
एकूणच, एसटीची आर्थिक गाडी हळूहळू ट्रॅकवर येताना दिसत आहे. भाडेवाढीचा परिणाम महसुलात दिसू लागला असला तरी प्रवाशांचा संताप आणि मागणींना किती काळ दाबून ठेवता येईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.