[ विशेष / प्रतिनिधी ]
मिऱ्या- नागपूर महामार्गाचे काही महिन्यांपूर्वीच करण्यात आलेले काँक्रीटीकरणाच्या मार्गिकेला ठिकठिकाणी मोठे तडे गेले असून निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना समोर आला आहे. ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीकडून हे काम करण्यात येत असून सध्या रस्ता बंद करून तात्पुरते मलमपट्टीचे कामकाज सुरू आहे. मात्र रस्त्यावरील भेगा पाहून नागरिक, प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसत आहे.
नागपूर महामार्गावरील कारवांचीवाडी परिसरात रस्त्यावर पडलेल्या भेगांमुळे प्रवासी आणि वाहनधारकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. रस्ता बांधून वर्षही उलटले नाही, तरीही त्यात तडे जाऊ लागल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावरून एकच प्रश्न उपस्थित होतो की, महामार्ग प्राधिकरण विभाग झोपला आहे काय? रस्त्यांचे काम झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, देखरेख करणे आणि दोष दिसल्यास संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेणे ही या विभागाची जबाबदारी असते. मात्र, प्रत्यक्षात यातील कुठलाही टप्पा नीट पार पडलेला दिसत नाही. रवी इन्फ्रा कंपनीने वेगाने काम करत असल्याचे दाखवून दर्जाहीन काम केल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे. काँक्रीटीकरण मर्गिका तुकड्यात पूर्ण झाल्यानंतर त्याची तपासणी, गुणवत्ता चाचणी आणि वारंवार देखरेख होणे गरजेचे असतानाही या कामांकडे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी डोळेझाक का केली, हा मोठा प्रश्न आहे.
कारवांचीवाडी परिसरात काँक्रीटीकरण मार्गिकेवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे हे काम पूर्ण होऊन अवघे काही महिनेच झाले असून वर्षही उलटले नाही, तरीही महामार्गात मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत. यावर सध्या लिक्वीड भरून भेगा बुजवण्याचा प्रयत्न होत असला, तरी हे केवळ तात्पुरते मलमपट्टीचे काम असून त्याने समस्या सुटण्याची शक्यता कमीच आहे.
रवी इन्फ्रा कंपनीवर संशयाचे ढग
महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्रा या कंपनीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व योग्य पद्धतीने काम न केल्यानेच आज रस्ता भेगाळला असल्याचा आरोप काही स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर भेगा अधिक गहऱ्या होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, ज्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जनतेतून संताप, काँक्रीटीकरण कामाची चौकशीची मागणी
कारवांचीवाडी येथील नागरिकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सरकारकडून हजारो कोटींचा निधी रस्ते विकासासाठी मंजूर होतो, मात्र ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीने तो निधी वाया जातो. याची किंमत आम्हाला जीव धोक्यात घालून वाहतूक करताना चुकवावी लागते,” असे एक स्थानिक नागरिक म्हणाले. या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. ठेकेदार कंपनीच्या कारभारावर व प्रशासकीय यंत्रणेवर जनतेचा विश्वास राहिला नसून, यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालावे व कठोर पावले उचलावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
जनतेचा कोट्यवधी रुपयांचा निधी वापरून तयार झालेल्या रस्त्यांमध्ये काही महिन्यांतच भेगा पडणं, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे मोठे योगदान असून, ती एकप्रकारची ठेकेदार कंपनीच्या बाजूने केलेली मौन संमती म्हणावी लागेल. त्यामुळे रस्ता उध्वस्त झाला, त्याची जबाबदारी कोण घेणार?, मार्गिकेवर निकृष्ट काम करणाऱ्या कंपनीवर कारवाई कधी होणार? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.