( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सहकार क्षेत्रात आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणाऱ्या शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुचांबे यांच्या कसबा शास्त्रीपूल येथील १६व्या शाखेचे उद्घाटन नुकतेच खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी बोलताना खासदार राऊत म्हणाले, “सहकार क्षेत्रात यश मिळवणे हे केवळ आर्थिक व्यवहारांवर नव्हे, तर लोकांच्या विश्वासावर आधारित असते. शिववैभव पतसंस्थेने हा विश्वास मिळवून सहकार क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत. हे यश अधिक वृद्धिंगत व्हावे, हीच अपेक्षा आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन होते. त्यांनी आपल्या भाषणात सहकारातील समन्वय आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करत संस्थेच्या यशामागे सर्व सभासदांचे आणि कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद केले. “महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा. एक शाखा जर १५ कोटींची उलाढाल करू शकत असेल, तर संपूर्ण संस्था लवकरच १०० कोटींचा टप्पा पार करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश थेराडे यांनी डिजिटल युगात संस्थेची वाटचाल सुस्पष्ट करत मोबाईल अॅपच्या माध्यमातून सेवा पुरवण्याची माहिती दिली. “विविध भागांमध्ये २५ शाखांचे जाळे उभारण्याचा आमचा संकल्प आहे. यावर्षी शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करण्याचे आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात संतोष थेराडे, राजेंद्र सुर्वे, सहदेव बेटकर, डॉ. सोपान शिंदे, प्रभाकर घाणेकर, अमित ताठरे, सरपंच चंद्रकांत फणसे, सरपंच पूजा लाणे, प्रज्ञा कोळवणकर, दत्ता लाखन, अरविंद जाधव, विनोद (बाबू) पवार, संजय कानाल, प्रकाश टाकळे, बाळकृष्ण काष्टे, प्रकाश घडशी, रामचंद्र बांबाडे, उल्हास घाणेकर, मयूर भिंगार्डे, भिकाजी बसवणकर गुरुजी, अजिंक्य ब्रीद, प्रदिप शिंदे, रवींद्र खेराडे, सुयोग कानाळ, विवेक शेरे, रवींद्र मुंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सोपान शिंदे यांनी पतसंस्थेच्या सुरुवातीच्या संघर्षाविषयी सांगताना “सुरुवातीच्या दिवशीच ५० लाख रुपयांचे ठेवी मिळाल्या म्हणजे जनतेचा दृढ विश्वास आहे,” असे स्पष्ट केले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे सचिव संतोष थेराडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या १६ शाखांचा उल्लेख करत “प्रत्येक शाखेचा व्यवसाय कोटीत असून, सहकारातील नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे,” असे सांगितले.
उद्घाटनप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.