(नवी दिल्ली)
देशामध्ये सध्या अशांतता आहे, त्याचे कारण म्हणजेच सुरु असलेले पाकिस्तानविरूध्द युध्द. भारत आणि पाकिस्तानमधील वातावरण चिघळत चालले आहे, त्यामुळे भारतामध्ये चिंतेच्या वातावरणामुळे देखील तणाव वाढत आहे. त्यामुळे आयपीएलदेखील काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान, बीसीसीआयने आयपीएल-२०२५ पुढे ढकलले होते. आता यासंदर्भात एक मोठी अपडेटसमोर आली आहे.
बीसीसीआयने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, आयपीएल एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. तथापि, एका आठवड्यानंतर म्हणजेच 7 दिवसानंतर लीग पुन्हा सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. क्रिकइन्फोमधील एका वृत्तानुसार, जर आयपीएल मे महिन्यात सुरू होणार असेल तर बीसीसीआयने अद्याप त्याच्या कट-ऑफ तारखा निश्चित केलेल्या नाहीत. सध्याच्या परिस्थिती पाहता आयपीएल लवकर सुरू करणे कठीण असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.
शुक्रवारी फ्रँचायझी अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली. क्रिकइन्फोशी बोलताना, अनेक संघांच्या अधिकाऱ्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे की उर्वरित आयपीएल या वर्षाच्या अखेरीस खेळवता येईल. मे महिन्यात आयपीएल पुन्हा सुरू करण्यात बीसीसीआयसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे परदेशी खेळाडू. परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतू लागले आहेत. शनिवारपर्यंत बहुतेक खेळाडू त्यांच्या देशात रवाना होतील. तणावाच्या परिस्थितीत, मे महिन्यामध्ये आयपीएल पुन्हा सुरू झाले तर त्याचे पुनरागमन कठीण होईल.
फ्रँचायझींना आशा आहे की जर आयपीएल सुरू झाले तर खेळाडू परत येतील, परंतु त्यांनी हे देखील मान्य केले आहे की जर २५ मे नंतर असे झाले तर परदेशी खेळाडू परत येतील याची कोणतीही हमी नाही. याचे कारण म्हणजे अनेक देशांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या द्विपक्षीय मालिका. आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता आणि तोपर्यंत सर्व देशांचे खेळाडू तयार होते, परंतु त्यानंतर ते त्यांच्या देशाला प्राधान्य देतील. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही ११ जून रोजी लॉर्ड्सवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
या सिझनमध्ये आतापर्यंत 57 सामने खेळवण्यात आले आहेत यामध्ये 58 वा सामना धर्मशाला येथे खेळवण्यात येत होता हा सामना अचानक गोळीबार झाल्यामुळे थांबवण्यात आला होता. त्यानंतर हा सामना पुन्हा खेळवला जाणार कि नाही यावर अजुनपर्यत काहीही माहिती आलेली नाही.