( रत्नागिरी /प्रतिनिधी )
भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली असून, संपूर्ण विभाग अलर्ट मोडवर आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून, नव्या रजा देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे. विशेषतः सागरकिनारी भागात गस्तीसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. सागर सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सदस्यांनाही अधिक सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयित बोटी अथवा व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, तसेच सागरी सीमावर्ती भागांवर खास लक्ष ठेवण्यात येत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस विभाग सज्ज आहे. नागरिकांनी कुठलीही संशयास्पद हालचाल, व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेता, महत्त्वाच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ९ मे रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २३ मे २०२५ रोजीपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जारी केला आहे.