(मुंबई)
जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैन्याशी लढताना मुंबई घाटकोपर येथील जवान मुरली नाईक यांनी वीरमरण पत्करले. त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. या हल्ल्यात भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याची दोन विमाने पाडली असून सीमारेषेवर अजूनही गोळीबार सुरू आहे. मुरली नाईक यांच्या शहादतीचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबियांसह घाटकोपर येथे शोककळा पसरली.
मुरली नाईक यांचे मूळ गाव आंध्र प्रदेशातील कल्की तांडा असून, त्यांचे वडील श्रीराम नाईक हे मुंबईतील घाटकोपर परिसरात मजुरीचे काम करत आहेत. आपल्या मुलाला भारतीय सैन्यात भरती करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिले. मुरली नाईक यांनी २०२२ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण देवळाली (नाशिक) येथे झाले. त्यानंतर आसाम, पंजाब आणि अखेर जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे त्यांची तैनाती झाली होती.
शहीद जवानाच्या निधनाचे वृत्त समजताच मुंबईतील त्यांचे कुटुंबीय, स्थानिक रहिवासी तसेच आंध्र प्रदेशमधील गावकऱ्यांनी त्यांच्या वीरगतीस श्रद्धांजली अर्पण केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटद्वारे मुरली नाईक यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाला सलाम केला. मुरली नाईक यांच्या बलिदानाबद्दल घाटकोपर वार्ड क्रमांक १३३ मध्ये बॅनर लावून स्थानिक नागरिकांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शहीद जवान मुरली नाईक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शुक्रवार, १० मे रोजी त्यांच्या मूळ गाव कल्की तांडा (आंध्र प्रदेश) येथे करण्यात येणार आहेत.