(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कशेडीच्या दोन्ही बोगद्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला असून, रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठाही येत्या १०-१५ दिवसांत सुरळीत होणार आहे. उन्हाळी गर्दी लक्षात घेता महामार्ग विभागाने कामांना युद्धपातळीवर सुरुवात केली असून, १५ मेपूर्वी दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने खुला होतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.
मुंबईतील गावी जाणाऱ्यांची वाढती संख्या आणि सणासुदीचा काळ लक्षात घेता, या बोगद्यांना पर्याय नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच बोगद्यांतील गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राऊंटिंग करण्यात येणार असून, २४ तास अखंड वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्रकाशमान बोगदे – २०० पथदिपांची उभारणी
वाहतुकीच्या सुरळीततेसाठी दोन्ही बोगद्यांच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गांवर एकूण २०० पथदिपांची उभारणी करण्यात येणार आहे. विद्युत खांब आणि इतर यंत्रसामग्री जागेवर पोहोचली असून, पुढील एक-दोन दिवसांत हे काम प्रत्यक्षात सुरू होईल. संपूर्ण कार्य पूर्ण होण्यासाठी अंदाजे २० दिवसांचा कालावधी लागेल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.