(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी शिंदेवाडी येथील नव्याने टाकण्यात आलेली पाईपलाईन जमिनीच्या दोन फूट जमिनीत टाकण्याऐवजी ती जमिनीच्यावर आली असून सदरची पाईपलाईन योग्य त्या प्रमाणात जमिनीमध्ये टाकण्यात यावी अशी आग्रही मागणी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष व सेवाभावी कार्यकर्ते दीपक शिंदे यांनी केली आहे.
कळझोंडी गावातील बौद्धवाडी, आग्रेवाडी, शिंदेवाडी, तिखवटवाडी, ब्राह्मणवाडी अशा विविध वाडयामधून पाणीपुरवठा पाईपलाईन गेली असून सदर पाईप लाईन या दोन फूट जमिनीत जाणे आवश्यक आहे. परंतु येथील ठेकेदाराने काही भागातील पाईपलाईन योग्य प्रमाणात खोदाई करून पूर्ण केलेली आहेत. मात्र काही भागात सदरच्या पाईपलाईन जमिनीवरील भागाच्या वरच्यावर टाकण्यात आलेली आहे. येथील ब-याच पाईप लाईन जमिनीच्यावर दिसत आहेत. या बाबत यापूर्वी ही या गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी संबंधित ठेकेदार, अधिकारी कर्मचारी यांना दाखविलेल्या आहेत.
परंतु अजूनही शिंदेवाडी येथील वाडीतील पाईप लाईन जमिनीच्या वर दिसत आहेत.तरी सदरची पाईपलाईन ही नियमावलीनुसार योग्य त्या प्रमाणात जमिनीत टाकण्यात यावी अशी आग्रही मागणी येथील नागरिक दिपक शिंदे यांनी केली आहे.