(विशेष / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीच रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उपसा आणि वाहतुकीचा अवैध धंदा बेफाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे. विशेषत: रात्री १२ नंतर संगमेश्वर तालुक्यातील कळंबोशी मार्गे खेरशेत हायवे परिसरात वाळू उपसा आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
जिल्ह्यातील अनेक चेक नाके केवळ नावापुरते कार्यरत असून, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हप्त्याच्या बदल्यात डोळेझाक करीत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. परिणामी, सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून, “यंत्रणा कोणाच्या दारी पाणी भरते आहे?” अशी जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हे सर्व काही पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घडत असून, चेक नाके केवळ नावापुरते उभे आहेत. सामान्य नागरिक घरकुलासाठी वाळूसाठी अर्ज करत वणवण फिरत आहेत, तर दुसरीकडे माफियांना वाळू ‘हप्त्याच्या’ मोबदल्यात खुलेआम पुरवली जात असल्याचे आरोप होत आहेत.
अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस ठाण्यांत नोंदवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचा जिल्ह्यात सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांच्या बदलीसाठी जागृत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे. तसेच कोकणातील अवैध वाळू धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे.
वाळू माफियांकडून दमदाटीचे प्रकार
अवैध वाळू उपशाला विरोध केल्यास माफियांकडून धमकी , दमदाटी करण्याचे प्रकार घडतात. हे सर्व प्रकार कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत, याचा शोध घेण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.