(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावस तीर्थक्षेत्री परशुराम जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रनपार गावाजवळ खाडीत नौका विहार करत असताना पर्यटकांची सरस्वती नावाची नौका मंगळवारी दुपारी ३ वाजता अचानक बुडाली. मात्र, प्रसंगावधान राखून आणि धाडस दाखवत फिनोलेक्स कंपनीच्या बोटी आणि सागरी कवच अभियानातील सुरक्षा जवानांनी १६ जणांचे प्राण वाचवले.
फिनोलेक्स जेटीच्या समोरच ही दुर्घटना घडल्याने गस्त घालणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तत्काळ फिनोलेक्सच्या दोन बोटींच्या सहाय्याने घटनास्थळी धाव घेतली. पूर्णगड सागरी पोलीस ठाणे, सागरी कवच अभियानातील कर्मचारी व बीएसएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई करत होडीतील सर्व प्रवाशांना सुखरूप किनाऱ्यावर पोहोचवले.
या घटनेत नौकेला मात्र खाडीत जलसमाधी मिळाली आहे. परंतु योग्य वेळी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांची मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. सध्या सागरी कवच अभियान अंतर्गत कोकण किनारपट्टीवर गस्त वाढवण्यात आली असून, या घटनेमुळे अशा मोहिमेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.