(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाला नवे बळ मिळणार आहे. या टप्प्यात जिल्ह्यातील ३९ रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून, यासाठी तब्बल १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे १२०.५४५ किलोमीटर अंतराचे दर्जेदार डांबरीकरण होणार आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्यांच्या १० वर्षे देखभाल-दुरुस्तीची तरतूद असून, यासाठी स्वतंत्रपणे १० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी राखून ठेवण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता कायम राहणार आहे.
राज्यातील ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आणि अद्याप रस्त्याने न जोडलेल्या वाड्या-वस्त्यांना जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली आहे. प्रधानमंत्री योजनेत न समाविष्ट झालेल्या आणि अस्तित्वात असलेल्या मोडकळीस आलेल्या रस्त्यांचेही दर्जोन्नतीचे काम यामध्ये करण्यात येत आहे.
या कामांतर्गत समाविष्ट महत्त्वाचे रस्ते :
रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, दापोली, खेड आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये कामे होणार आहेत. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत कडवई-ओकटेवाडी, गोळवली-शेंबवणे, कर्ली गावठाणवाडी-देवधर, धामापूर-मावळंगे-मांडवकरवाडी आदी रस्त्यांचा समावेश आहे. तर रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यात दांडेआडोम-भावेआडोम, भोके आंबेकरवाडी-बुद्धवाडी, चवे-निवईवाडी, गणेशगुळे-कुर्धे-मेर्वी, टेंभ्ये-भैरीजुगाई मंदिर-खाडेवाडी आदी रस्त्यांवर कामे होणार आहेत.
दापोली, खेड, मंडणगड तालुक्यांमध्ये आंबये नातूनगर, निळवणे बौद्धवाडी, भडवळे वावघर, वेळवी-धनकोली, दाभोळे भिवबंदर-आघारी तिवरेवाडी, आसोंड-उर्फी बोरीचाकोंड यांसारख्या रस्त्यांचा समावेश आहे. या कामांमुळे जिल्ह्यातील अंतर्गत दळणवळण अधिक सुलभ होणार असून, ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.