(रत्नागिरी)
तालुक्यातील गडनरळ ग्रामपंचायतीत शनिवारी (ता. २६) सकाळी जमिनीच्या वादातून चुलत भावांमध्ये जोरदार वाद उफाळून मारहाण झाली. यामध्ये संतोष पांडुरंग मेढेकर (वय ४५, रा. कोळीसरे, मेढेकरवाडी) यांना त्यांच्या चुलत भावाने पाठीला व मानेला चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव राजेश हरिश्चंद्र मेढेकर (वय ४२, रा. कोळीसरे, मेढेकरवाडी, रत्नागिरी) असे आहे. संतोष व राजेश हे नात्याने चुलत भाऊ असून, त्यांच्यात पूर्वीपासूनच जमिनीच्या हक्कावरून वाद सुरू आहे. शनिवारी तंटामुक्त समितीपुढे वाद मिटविण्यासाठी ते हजर झाले असता, अचानक दोघांत बाचाबाची झाली.
वाद चिघळल्याने राजेश मेढेकर यांनी संतोष मेढेकर यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि संतोष यांच्या पाठीवर व मानेलाही जोरदार चावा घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर संतोष मेढेकर यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.