(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील मानेवाडीमध्ये राहणाऱ्या संदीप सोनू रावणंग वय वर्षे 36 या तरूणाने आपल्या राहत्या घरी घराच्या वाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संदीप सोनू रावणंग या तरुणाने दिनांक 26 एप्रिल रोजी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये घराच्या वाशाला दोरीच्या साह्याने गळफास लावल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती अविनाश नारायण माने यांनी गणपतीपुळे पोलीस चौकीला दिली. यानंतर गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी व पोलिसांनी त्यांना गळफास घेतल्याच्या जागेवरून बाजूला केले. त्यानंतर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे नेण्यात आले. यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुरा जाधव यांनी त्यांची प्राथमिक तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे नेण्यात आले.
या घटनेचा पंचनामा करण्यात आला. संदीप याने गळफास का घेतला याबद्दल पोलीस तपास करीत आहेत. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी व निलेश भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल घोरपडे करीत आहेत. दरम्यान, गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या संदीप सोनू रावणंग यांच्या पश्चात आई,पत्नी, मुलगा व बहिणी असा परिवार आहे.