(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला. मारुती मंदिर परिसरात हाताला काळ्या फिती बांधून निषेध नोंदवत, दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘दहशतवादाचा नाश होवो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांना लक्ष्य करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी देशभक्तीची जाणीव जपत या क्रूर हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. प्रदर्शनादरम्यान सहभागी नागरिकांनी दहशतवाद्यांना कठोर शासन करण्याची मागणी केली.
निषेध आंदोलनात मुस्लिम समाजातील महिला, युवक, व्यापारी वर्ग तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकमुखाने दहशतवादाचा निषेध करत, देशाच्या अखंडतेसाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी राष्ट्रप्रेम व्यक्त करत, देशाच्या एकतेचा संदेश दिला आहे.