(मुंबई)
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतात वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून, २७ एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले असून, त्यांच्या राज्यांत वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्देशानंतर राज्यांमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सध्या उपलब्ध माहितीनुसार, राज्यात पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. विशेषतः नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक २,४५८ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. त्यानंतर ठाण्यात १,१०६ नागरिक, तर मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली आहे. या नागरिकांपैकी केवळ ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आहेत. तर १०७ पाकिस्तानी नागरिक गायब असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या भयंकर घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. सरकारकडून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे संकेत देण्यात आले आहेत आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध तातडीने कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती पाकिस्तानी?
अकोला – 22
अहिल्यानगर -14
अमरावती (सी)- 118
छत्रपती संभाजीनगर (सी )- 59
बुलढाणा – 7
धुळे – 6
गोंदिया – 5
जळगाव – 393
जालना – 5
कोल्हापूर – 58
लातूर – 8
मुंबई -14
नागपूर – 2458
नांदेड 4
नंदुरबार – 10
नवी मुंबई – 239
पिंपरी चिंचवड – 290
पुणे – 114
ठाणे- 1106