( राजापूर / तुषार पाचलकर )
कोंकणस्थ (संगमेश्वरी ) वैश्य समाज संस्थेची गिरगांव, मुंबई येथे १ऑगस्ट १८८७ साली सामाजिक बांधिलकी,कर्तव्य तत्परता, त्याग,दातृत्व अश्या विचारसरणीच्या तात्कालीन वैश्य समाज धुरीणांनी स्थापना केली. संस्था मागील १३७ वर्षे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतीक, उपक्रम राबवून वैश्यवाणी ज्ञाती बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून वैश्यवाणी समाजातील निराधार महिलांना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच गरजू समाज बांधवांना त्वरित वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात येते. विदयार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व आर्थिक मदत केली जाते. वार्षिक कार्याचा अहवाल तसेच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केलेल्या बांधवांचा पुरस्कार देऊन सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी वर्धापनदिन, वधू -वर पालक परिचय मेळावा, स्नेह संमेलन, क्रीडा स्पर्धा, गणेश उत्सव, वार्षिक सहल असे विविध उपक्रम प्रतिवर्षी अखंडितपणे राबवीत आहे.
कोंकणस्थ (संगमेश्वरी ) वैश्य समाज या मातृसंस्थेच्या संलग्न वैश्य सहकारी बँक लि., मुंबई विडी तंबाखू पतपेढी, वैश्य विद्या वर्धक समाज, मुंबई विडी व्यापारी तंबाखू अश्या संस्था कार्यरत आहेत. संस्थेची ध्येय, उदिष्टे आणि कार्य ग्रामीण भागातील वैश्यवाणी बांधवांपर्यत पोहचावीण्याच्या उद्देशाने संस्थेने राजापूर पूर्व भागातील वैश्यवाणी बांधवांचा भव्य स्नेह मेळावा रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी पाचल शेजारी तळवडे येथील प्रभावती हॉलमध्ये आयोजित केला आहे. सदर स्नेह मेळाव्यात सर्व वैश्यवाणी ज्ञाती बांधवानी उत्स्फूर्तपणे व मोठया संख्येने उपस्थित रहावे.
सकाळी ९.०० वा. श्री गणपती मंदिर, पाचल ते प्रभावती सभागृह तळवडे विविध गावातील रथा सहित शोभायात्रेने स्नेहमेळाव्याची सुरुवात होईल. सभागृहात मनोरंजन, महिलांसाठी हळदीकुंकू मान्यवरांचे स्वागत होईल. ग्रामीण भागात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्याऱ्या बांधवांचा वैयक्तिक व वैश्य समाज उपयोगी उपक्रम राबाविणाऱ्या मंडळाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल. समाजाच्या उन्नतीसाठी मान्यवारांकडून समाज बांधवाना मार्गदर्शन केले जाईल, त्यानंतर स्नेहभोजन करुन सदर स्नेह मेळावा संपेल.