(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संताप व्यक्त होत असून, रत्नागिरीत शुक्रवारी सकल हिंदू समाजाच्यावतीने जोरदार जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
सायंकाळी ४:३० वाजता गाडीतळ येथून सुरू झालेला हा मोर्चा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. हातात भगवे झेंडे, निषेध फलक आणि गगनभेदी घोषणांनी शहराचे वातावरण भारावून गेले. महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी होती. या घटनेच्या तीव्र निषेधार्थ घेण्यात आलेल्या मोर्चात रत्नागिरीतील सर्वच घटकांनी सहभाग नोंदवला. “जात नाही, धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या जिहादी मानसिकतेचा नायनाट व्हावाच” अशी संतप्त प्रतिक्रिया मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सभेचे रूप घेतलेल्या या मोर्चात छत्रपती संभाजीनगर येथील हर्ष ठाकूर यांनी मार्गदर्शनपर भाषण करत जाणीवजागृती केली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते.
मोठा पोलिस बंदोबस्त
मोर्चा गोखले नाका, मारुती आळी मार्गे जाणार असल्यामुळे पोलिसांकडून संपूर्ण मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात होते, तर सीसीटीव्ही आणि पोलिस कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही लक्ष ठेवण्यात आले.