(राजापूर / प्रतिनिधी)
तालुक्यातील ओणी येथील पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.१५ वाजता घडला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सतीश रविदास नायक (वय ४५, रा. त्रिभुवन सोसायटी, आनंदनगर, डोंबिवली, ठाणे) हे कुटुंबासह कर्नाटकातील उडपी येथे गेले होते. तेथून परत येताना, ओणी गावाजवळील पेट्रोलपंपासमोरील रस्त्यावर त्यांनी आपली कार थांबवली होती. त्यावेळी त्यांच्या पत्नी व मुलगी गाडीत बसत असताना, अचानकपणे मागून भरधाव वेगात येणाऱ्या अशोक लेलँड १६२८ (पॅक बॉडी) ट्रकवरील संशयित आरोपी चालक शिहाबुद्दीन अमीरकन्नू राउतार (वय ४३, रा. पल्लीपुरा, कोल्लम, केरळ) याने ओव्हरटेक करताना निष्काळजीपणे वाहन चालवत कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात कार सुमारे २५-३० फूट पुढे फेकली गेली. सतीश नायक यांच्या डाव्या हातास व कमरेस, त्यांच्या पत्नी कात्यायनी नायक यांच्या डोक्यास, चेहऱ्यास व खांद्यास तर मुलगी समीक्षा नायक हिला कमरेस व डोक्यास गंभीर दुखापत झाली. या अपघात प्रकरणी ट्रकचालकावर गु.र.नं. ७३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.