( साखरपा / भरत माने)
मिऱ्या नागपूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. लांजा राजापूर साखरपा आमदार किरण सामंत यांनी कामाचा आढावा घेण्यासाठी महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी यांचा संयुक्त पाहणी दौरा करंजारी ते आंबा घाट पर्यंत केला. यावेळी त्यांच्यासमवेत प्रांत अधिकारी जीवन देसाई, हायवे विभाग व ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रस्त्याच्या चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेले प्रश्न व समस्या यावर उपाययोजना लवकरात व्हाव्यात जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही दुर्घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी केल्या. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर त्यावर उपाययोजना कराव्यात असे आदेश महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीला दिले. तसेच या दौऱ्यात ज्या नागरिकांना अजून मोबदला मिळाला नाही अशा नागरिकांचा लवकरात लवकर मोबदला मिळाला पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
करंजारी, देवळे, दाभोळे, तिवरे, मेढे, कोंडगाव, साखरपा, दक्खन आदी भागातील नागरिकांच्या समस्या आमदार किरण सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार सामंत यांच्या या दौऱ्याला लवकरच चालना मिळणार आहे व नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटण्यास मदत होणार आहे.