(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी बौद्धवाडी व सुंदर वाडी येथील गुरांनी प्लास्टिक युक्त पिशव्या, विषारी फवारणीचे कुजलेले आंबे, बोंडे, खाल्ल्याने पोटामध्ये विषबाधा होऊन सुमारे ८ ते ९ गुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान ऐन पावसाळी हंगामाच्या पूर्वसंध्येला झाल्याने येथील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कळझोंडी धरण परिसरात अनेक गुरे घोळक्याने चरत असतात. मात्र मंगळवार दिनांक २२ रोजी सायंकाळी पाच सहा वाजण्याच्या सुमारास तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार,वैभव पवार, विजय पवार, नागेश पवार यांची पाळीव जनावरे बैल व गाय) अचानक चालायची बंद झाली. ठिकठीकाणी रस्त्यावर बसून राहिले. तिथेच पुर्ण अंग टाकून हासडे देत तोंडातून फेस येऊन मरण पावली. अचानक या गुरांना झाले तरी काय ?म्हणून येथील सुज्ञ शेतकरी किशोर पवार यांनी सदर घटनेची माहिती पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.एस.काळे यांना दिली.
सदर घटनेची गंभीरता ओळखून काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे खंडाळा येथील सहकारी कर्मचारी सुनील अलकुंटे यांच्या सहकार्याने कळझोंडी घटनास्थळी भेट दिली व नागेश पवार यांची गाय मरण यातना भोगत होती यांच्या गाईवर औषधोपचार केले. सलाईन लावून एक रात्र गाय वाचली. पहाटे या गाईनेही प्राण सोडला. मग गाय मालक नागेश पवार व गावकरी शेतकरी यांनी या गाईचे पीएम करण्याचा आग्रह धरला. त्यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी कर्मचारी सुनील अलकुंटे यांनी या गाईचे पीएम केले. त्यावेळी या गाईच्या पोटात प्लास्टिक पिशव्यांचा सुमारे ५ किलो वजनाचा मोठा चोथा, आंब्याच्या कोई सापडल्या.
प्लास्टिकमुळे व विषारी फवारणी या गुरांना श्वसन श्वासोच्छ्वास करण्यास फार मोठा त्रास जाणवत होता. यातच या गुरांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कळझोंडी गावात शेतकऱ्यांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी याच गावातील सुज्ञ नागरिक किशोर पवार व अनंत पवार यांच्या गुरांनाही त्रास जाणवत होता. मात्र त्यावेळी गावातील पशुतज्ञ रवींद्र वीर व सुनिल अलकुंटे यांनी उपचार करून या दोन गुरांना वाचविण्यात यश मिळविले होते.
सदर घटनास्थळी गावकरी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, ग्रामपंचायत कर्मचारी भीमराज पवार, सुभाष पवार, शेतकरी अनंत पवार, नागेश पवार ,प्रमोद पवार प्रबोध पवार ,विजया पवार ,कुंदा पवार, स्मिता पवार, वैभव पवार, बाळकृष्ण पवार ,प्रकाश पवार आदी ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते .कळझोंडी गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना काही दिवस मोकाट सोडू नये ,खबरदारीचा उपाय म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना खंडाळा येथून आवश्यक असलेला औषधोपचार दवाखान्यात येऊन घेऊन जावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस एस काळे यांनी केले आहे. सदर औषधोपचार तेथील कर्मचारी सुनील अलकुंटे हे वितरित करीत आहेत अशी माहिती डॉ.काळे यांनी दिली.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.काळे व त्यांचे सहकारी कर्मचारी सुनील अलकुंटे यांनी तातडीने केलेल्या सहकार्यामुळे व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे कळझोंडी गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.