(देवरूख)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था संचलित आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरिंग पदवी व एम एम एस पदव्युत्तर पदवीधर विद्यार्थ्यांसाठी दीक्षांत (पदवीदान) समारंभ नुकताच संपन्न झाला. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या २३ व्या इंजिनिअरिंग पदवीधर तुकडीचे व १३ व्या एम एम एस पदव्युत्तर तुकडीच्या पदवीदान समारंभासाठी देवरुख येथील आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुरेश जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थाध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. रविंद्र माने, कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी मान्यवरांच्या व्यासपीठावरील उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बहुसंख्य स्नातक, पालक, विभागप्रमुख व प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.
प्रथम दीपप्रज्वलन झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या गीताने समारंभाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मा. रविंद्र माने यांनी संस्थेच्या वतीने डॉ. सुरेश जोशी यांचे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून स्वागत केले.
यानंतर महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व अंतिम वर्ष इंजिनिअरिंग व एम एम एस च्या निकालांचे सखोल विश्लेषण सादर केले. महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९०. ८६ टक्के लागला असून आजपर्यंत इंजिनिअरिंगमधून ६००० विद्यार्थी तर एम एम एस शाखेतून ४५० विद्यार्थी बाहेर पडल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी आपल्या भाषणात स्नातकांना या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्राप्त केलेली पदवी म्हणजे मागील चार वर्षांच्या तुमच्या परिश्रमाचे फलित असून पुढे या ज्ञानाचा वापर करून प्रत्येकाने समाज व पर्यायाने आपल्या देशाच्या विकासामध्ये योगदान द्यावे असे त्यांनी म्हटले.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुरेश जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, इंजिनिअरिंग क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून यामध्ये तुमची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यांनी उपस्थित स्नातकांना आपल्या पूर्वजांनी, प्राचीन ऋषींनी आणि विद्वानांनी प्रचंड प्रमाणात केलेली ज्ञाननिर्मिती वाचवा, वापरा, वाढवा व वाटा हा गुरुमंत्र दिला. यासाठी त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतनजी टाटा व शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे उदाहरण दिले. तसेच परिवर्तन हा जीवनाचा गाभा असून स्वातंत्र्य, समता व बंधुत्व राखण्यासाठी प्रयत्नरत रहा असा संदेश दिला.
यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा. रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले कि या महाविद्यालयाद्वारे कोकणची शैक्षणिक कमतरता भरून काढण्याची मला संधी मिळाली. ज्ञान व विकासाची तळमळ या गोष्टी यश मिळवून देतात. इंजिनिअरिंग हि काळाची गरज असून स्नातकांना देशासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर उपस्थित सर्व स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघटनाप्रमुख प्रा. वैभव डोंगरे, परीक्षा विभागप्रमुख प्रा. विश्वनाथ जोशी तसेच परीक्षा विभागातील लिपिक विनायक गोवरे, निलेश कानसरे आदी कर्मचा-यानी परिश्रम घेतले. महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांनी यानंतर विद्यार्थ्यांची विभागवार सभा घेऊन विद्यार्थी व पालकांसमवेत हितगुज केले. रोजगारप्राप्त व उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. स्नेह्भोजानानंतर समारभाची सांगता झाली.