(संगमेश्वर / एजाज पटेल)
एखादे सरकारी काम करण्यासाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागतात. एवढे करूनही ते काम वेळेत होईल याची शाश्वती नसते. त्यामुळेच “सरकारी काम अन् सहा महिने थांब” ही म्हण रूढ झाली. मात्र, संगमेश्वर महावितरण अधिकाऱ्यांनी संभाजीनगर भागातील धोकादायक आणि अपघाताला निमंत्रण देणारे विजेचे लोखंडी खांब बदलण्याची मागणी केल्यानंतर अवघ्या चार दिवसात चार खांब बदलल्याने स्थानिक ग्रामस्थांनी येथील कार्यालयात जाऊन शाखा अभियंता फारुख गवंडी यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही आभार मानले आहेत.
संगमेश्वर येथील संभाजीनगर येथील लोकवस्तीच्या ठिकाणी असलेले विजेचे लोखंडी खांब हे सुमारे साठ वर्षापूर्वीचे असून यातील काही लोखंडी खांब हे गंजले होते. सदर खांब बदलण्यात यावे अशी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थांकडून तोंडी मागणी केली जात होती, परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे काम सबंधितांकडून केले जात होते.
मोठी लोकवस्ती तसेच रहदारी रस्त्याच्या ठिकाणी विद्युत भारीत वीजवाहिन्यांचा भार घेऊन सबंधितांच्या दुर्लक्षित कारभारामुळे उभे असलेले खांब जीर्ण होऊन तुटून जमीनदोस्त झाल्यास संभाव्य हानी होण्यापूर्वी धोक्याची घंटा देत असलेले हे खांब बदलण्यात यावेत म्हणुन येथील कार्यालयाचे उंबरठे अनेकदा झिजवून काही उपयोग होत नव्हता. आज करतो उद्या करतो अशीच गेली कित्येक वर्ष आश्वासने येथील ग्रामस्थांच्या पदरात पडत होती. त्यामुळे सरकारी काम आणि सहा महिने थांब, अशी ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होणारी प्रचलित म्हण ही केवळ म्हण नसून ती सत्यता आहे असेच येथील लोकांना वाटत होते.
मात्र काही दिवसांपूर्वी येथील महावितरणच्या शाखा अभियंता पदी रुजू झालेले फारूक गवंडी यांची ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार आणि वस्तीतील ग्रामस्थांनी कार्यालयात जाऊन जीर्ण व अपघाताच्या प्रतीक्षेत असलेले खांब बदलण्याची विनंती केली असता त्यांनी काही दिवसातच खांब बदलण्याचे आश्वासन देत अवघ्या चार दिवसातच जीर्ण व अपघाताच्या प्रतीक्षेत असलेले ते खांब काढून त्या ठिकाणी नवीन खांब बसवून आपल्या तत्पर कामाची चुणूक दाखवली आहे.
शाखा अभियंता फारुख गवंडी यांनी वेळीच दखल घेऊन अपघाताच्या प्रतीक्षेत असलेले खांब बदलण्याचा निर्णय घेतल्याने संभाव्य धोक्याच्या व दहशतीत वावरणाऱ्या लोकांनी चांगलाच सुटकेचा श्वास सोडला आहे. शाखा अभियंता फारुख गवंडी यांच्या कार्याने समाधानी झालेल्या येथील लोकांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मनापासून आभार मानले.