(संगमेश्वर)
पूर्वीचा रत्नागिरी-कोल्हापूर व सध्याचा मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबाघाटातील चौपदरीकरण वेगात सुरू आहे. या ठिकाणी दरड खाली येऊ नये म्हणून कंपनीकडून चांगल्या प्रकारच्या जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे; मात्र याउलट दरीच्या बाजूने असणारे कठडे योग्यरित्या संरक्षित केले नसल्याने मागील १५ दिवसांत त्या ठिकाणी ट्रकचे दोन अपघात घडले आहेत. तिथे सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून सुरू आहे.
कोल्हापूरवरून रत्नागिरीच्या दिशेने येताना रस्त्याची रूंदी अरुंद आहे त्याचबरोबर जागेवर वळण असल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करणे गरजेचे आहे. ठेकेदार कंपनी व महामार्ग विभाग यांनी ताबडतोब यावर कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वसामान्य यांच्याकडून होत आहे. यापूर्वी अनेक गाड्या दरीत जाऊन प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. या ठिकाणी पर्यटकही घाटाचा आनंद घेण्यासाठी थांबतात. भविष्यात तिथे मोठी दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
त्याठिकाणी २८ मार्च दिवशी दोन ट्रक खोल दरीत कोसळून अपघात घडला होता. त्यात ट्रकचे नुकसान झाले होते. दरी खोल असल्यामुळे ट्रकचे अवशेष व त्यामधील माल काढणेही अवघड झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाले.