(मुंबई)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. कुणालच्या वकिलांनी कोर्टात आपली बाजू मांडताना असा युक्तिवाद केला की, या प्रकरणात ज्यांची बदनामी झाल्याचा आरोप आहे, त्यांनी तक्रार केलेली नाही आणि ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांनी आपली बदनामी झाल्याचे म्हटले नाही. त्यामुळे अशा प्रकारे गुन्हा दाखल करणे हा सत्तेचा गैरवापर आहे. तुम्ही सार्वजनिक क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यावर टीका होणारच. मात्र तुम्ही कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाही. त्यानंतर न्यायालयाने कामराला अटक करण्याची गरज नाही. तामिळनाडूत जाऊन त्याचा जबाब नोंदवू शकता, असे आदेश पोलिसांना देत निकाल राखून ठेवला. जबाब नोंदवण्यासाठी अटकेची गरज नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा दिला. तसेच त्याचा जबाब नोंदविण्यासाठी तुम्ही तामिळनाडूत जाऊ शकता, असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या कुणाल कामराच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे. याप्रकरणी बुधवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान अॅड. नवरोज सीरवी यांनी कुणाल कामराची बाजू मांडली, तर सरकारी वकील ॲड. हितेन वेणूगावकर यांनी पोलिसांच्या वतीने युक्तिवाद केला. या युक्तिवादादरम्यान सरकारी वकील हितेन वेणूगावकर यांनी कुणाल कामराच्या याचिकेत तथ्य नसल्याचे सांगत ती याचिका रद्द करण्याची मागणी केली, पण यावेळी न्यायालयाने ती मान्य केली नाही. याबाबत काही सवाल उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले की, कुणाल कामराने उपमुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक जीवनावर टिप्पणी केलेली नाही. त्याने त्यांच्या सरकारी धोरणांवर किंवा निर्णयांवर कोणतीही टीका केलेली नाही.
कुणाल कामराचे स्टेटमेंट घेण्याची गरज आहे का?
कामराच्या जीवाला धोका असताना आपण चौकशीला त्याला स्वतः उपस्थित राहण्याबाबत का सांगत आहात? त्यांच्या जीवाला धोका आहे, तर मग आपण त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार का? तुम्ही तेथे जाऊनही जबाब नोंदवू शकता. आम्ही जर तुम्हाला तिथे जाऊन जबाब नोंदवण्याची परवागी देत आहोत मग काय हरकत आहे? असेही कोर्टाने म्हटले.
यानंतर कोर्टाने कुणाल कामरा हे मुंबईत कधी येतात, असे विचारले. आम्ही तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने जबाब नोंदवण्याबाबत सहकार्य करण्याबाबत सूचना करू शकतो. आपण जबाब नोंदवा, पण अटक करण्याची गरज नाही, हे तर पोलिसांनीही आपल्या समन्समध्ये म्हटले आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. कुणाल कामराप्रकरणी मुंबई हायकोर्टात दोन्हीही पक्षांची सुनावणी पूर्ण झाली असून याप्रकरणी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.