( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मंथन आर्ट स्कूल, रत्नागिरी यांच्या मंचावर वैचारिक चिंतन या अनुशंगाने माणसाला माणूस म्हणून जगायला अभिप्रेत असणारे तत्वज्ञान म्हणजेच ‘तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या विषयी मार्गदर्शन संपन्न झाले. हे मार्गदर्शन नंदकुमार यादव सर यांनी केले.
बाबासाहेब आणि तथागतांचे वैचारिक तत्वज्ञान याबाबत विवेचन करताना यादव सरांनी आर्य सत्य, पंचशील, अष्टांग मार्ग, त्रिपीठकांतील कथांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना संबोधित केले. विशुद्धी जीवन मार्ग, शील आणि सदाचाराचा मार्ग हे स्पष्ट करताना माणुस हा या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे यावर भाष्य केले. सरांचे पालीभाषेवर प्रभुत्व आहे. तथागताने सांगितलेले अडीच हजार वर्षापूर्वीचे ज्ञान आताच्या पिढीने कसे अभ्यासायला हवे याबद्दल दाखले देत माणुस म्हणून आपल्यात हे तत्वज्ञान कसे अंगीकृत केले पाहिजे याची माहिती दिली. तथागत बुद्धांनी दिलेले तत्वज्ञान हे कोण्या एका धर्म, जाती, पंथ, लिंगापुरते मर्यादित नसून समस्त मानवी प्राणीमात्रांसाठी त्यांच्याच कल्याणासाठी आहे हेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार यादव सर यांना शाखाप्रमुख प्रा.संदेश पालये यांच्या हस्ते शाल, रोपटे, डायरी देऊन करण्यात आली. याप्रसंगी प्रा. प्रतिक्षा पांचाळ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.