(गणपतीपुळे / वैभव पवार)
भारतात, महाराष्ट्रात आणि कोकणात मोठ्या प्रमाणात संस्कृती जोपासण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातात. समाजाच्या प्रबोधनासाठी या लोककलांचा वापर केला जात असे. मात्र लोकांच्या व्यस्ततेमुळे आज त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकांनी भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी आणि तिच्यात सातत्य ठेवण्यासाठी भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नमन कलावंत महादेव धोपट यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेत, शाळेच्या ६७व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शाळेच्या वतीने शाळेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यात शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कोकणातील पारंपरिक नमन शैक्षणिक स्वरूपात सादर केले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आज सर्वजण आपापल्या कामात गुंतलेले असताना, वाटद कवठेवाडी शाळेने शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत प्राचीन परंपरा असणाऱ्या नमन कलेचा परिचय व्हावा यासाठी नमन हा उपक्रम राबविला ही अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
यावेळी महादेव धोपट यांनी मागील अनेक वर्षे नमन आणि लोककला या क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांचे नमन करण्यासाठी पुढाकार घेणारे विश्वनाथ शिर्के यांच्यासह नमनात काम करणाऱ्या छोट्या कलाकारांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक नमन सादर करत, त्यातील कलाकारांनी आपली कला प्रदर्शित करत लोकांची मने जिंकून घेतली.
यावेळी शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, उपाध्यक्ष रमेश तांबटकर, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मारुती कुर्टे, वसंत आलीम, भाऊ धनावडे, सुरेश तांबटकर, प्रभाकर धोपट, अजित कुर्टे, हेमंत धनावडे उपस्थित होते. या नमन उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाटद कवठेवाडी, तांबटकरवाडी आणि धोपटवाडी मधील सर्व ग्रामस्थ यांनी प्रयत्न केले.