(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ गुप्त पद्धतीने आणले जातात. या अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई सापडत असून त्यांचे आयुष्य बरबाद होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचे समूळ नष्ट करण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कंबर कसली आहे. सोमवारी (दिनांक ७ एप्रिल २०२५) संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरातील कोकणनगर येथे पेट्रोलिंग करताना संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीकडे तीन लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किंमतीचा गांजा सापडला. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सतिश शिवरकर आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांबाबत गोपनीय माहिती प्राप्त करण्याचे काम चालु होते. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्याम आरमाळकर व पोलीस अंमलदार हे कोकणनगर ते प्रशांत नगर अशा मार्गावर पेट्रोलिंग करित असताना साईभुमी नगर बिल्डींगचे मागील बाजूस आले असता त्याठिकाणी एक इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्याने जागीच थांबवुन त्यांची चौकशी करुन त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव मन्सुर अली निजाम पठाण (वय ४० वर्ष रा. मिरज जि. सांगली ) असे सांगीतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे तीन लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किंमतीच्या पाच ब्राऊन कलरचे प्लास्टीकचे पाऊच त्यामध्ये उग्रवासाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ असुन, त्याचे वजन ५ किलो ५५.५ ग्रॅम आहे. हे सर्व सापडलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
मात्र ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी उपविभाग श्री. निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर व गुन्हे प्रकटीकरण पथकातील खालील पोलीस अधिकारी व अंमलदार पोलीस उप निरीक्षक श्याम आरमाळकर, सपोफौ दिपक साळवी, पोहेकॉ अरुण चाळके, पोहेकॉ अमोल भोसले, पोहेकॉ आशिष भालेकर, पोहेकॉ पंकज पडेलकर, पोहेकॉ भालचंद्र मयेकर, पोकॉनगअमित पालवे, पोकॉ कौस्तुभ जाधव यांनी केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.