( देवरूख / सुरेश सप्रे )
अघटित या शब्दाचा खराखुरा अर्थ कळणारी घटना आज पुन्हा घडली. या दुर्दैवी घटनेवर अजूनही विश्वास बसत नाही अवघे ४२ /४३ वय, अगदी उमेदीचे आणि स्वतः मधील साऱ्या कौशल्यांना सर्वांसमोर आणण्याचे, अशा वयात कोणी अर्ध्यावर डाव सोडला तर, मन सुन्नच होणारच. आज सकाळी राहुल विनायक फाटक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले, हा संदेश सोशल मीडियावर आला आणि अनेकजण पार कोलमडून गेले. अनेकांना आपला एक हातच निखळून पडल्याची जाणीव झाली. मन आणि डोळे एकाचवेळी भरून आले. कोणत्याही कामात जी तळमळ असावी लागते, ती राहुल जवळ ओतप्रोत भरलेली होती.
सामाजिक भान असणारा तरुण उद्योजक म्हणून अल्पावधीत राहुलने स्वतःची ओळख निर्माण केली आणि मंदार सारखीच परत एकदा सर्वांची साथ अर्धवट सोडली. राहूलने अर्ध्यावर आमची साथ सोडताना असंख्य मंडळींना जो काही संदेश दिला आहे, त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
वडील ग्रामसेवक आई शिक्षीका असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबात राहुलचा जन्म झाला. सर्व शिक्षण देवरूखात झालेवर नवीन व्यवसाय सुरु करत अल्पावधीत राहुलची ओळख संगणक मित्र म्हणून सर्वत्र झाली होती. राहुल हा सर्व जाती धर्माच्या मंडळींच्यात वावरणारा मोकळ्या मनाचा दीलदार मित्र होता. त्याचे अचानक जाणे धक्कादायक आहे. राहूलने व्यवसाय करताना सामाजिक जाणीवेतून विविध मंडळ. शैक्षणिक संस्थामधे काम करताना झोकून दिले. तसेच संघ व भाजपाचा सच्चा कार्यकर्ता म्हणूनही वेगळी छाप पाडली.
अनेकांची ओळख करून देणारा राहुल असाच अचानक सोडून गेला आणि अनेकांचे शब्दच गोठले. `राहुल’ हे आपले नाव त्याने आपल्या कामातून सार्थ केले. व्यवसाय करताना कोणाचीही भीडभाड ठेवायची नाही, हा गुण त्याच्यात होता. निर्भीड मनाचा त्याचा स्वभाव काहीसा करारी असल्याने एकदा एखादी गोष्ट मनात आली की ती पूर्णत्वास जाईपर्यंत तो अस्वस्थ असायचा. अशा वेळी जरी नुकसान झाले तरी, त्याला सामोरे जाण्याची त्याची तयारी असायची. व्यवसायात चौकस असावे लागते आणि अभ्यासही असावा लागतो. तो आत्मसात करून या आधुनिकतेच्या युगात संगणक मूल्य ओळखणारा राहुल होता. त्यामुळे त्याने संगणक विक्री व्यवसायाने राहुल ला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. संगणकीय क्षेत्रात हळूहळू बदल झाले व विविध पध्दतीला पर्याय उपलब्ध झाल्यानंतर कोणत्याही कोर्सला न जाता संगमेश्वर देवरुख परिसरात लॅपटॉप व कॅमेरा दुरूस्ती व देखभाल उत्तमरीत्या करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
कोणत्याही मोठ्या व्यक्तीजवळ बोलायचे झाले की ओळख असूनही तो बोलण्यात मागेच असायचा. ओळख आहे म्हणून पुढे पुढे करणे, फोटोसाठी धावणे अशा गोष्टी त्याला कधी शिवल्याच नाहीत. स्वतःची ओळख आपल्या कामाच्या सामर्थ्यातून करण्यावर त्याचा विश्वास होता. अगदी अखेरपर्यंत त्याने आपले या तत्वाला छेद दिला नाही. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात व सहकार्याच्या बाबतीत तो नेहमीच पुढे असे. तालुक्यातील युवकांनी एकत्र यावे, एकत्र वावरावे, विविध विषयांवर अभ्याससाठी एकत्र यावे, विविध सामाजिक उपक्रम राबवावे, कार्यशाळा घ्याव्यात यासाठी त्याची सतत धडपड आणि पुढाकार असायचा.
मध्यम उंची, गोरा वर्ण, मोजके शब्द, चेहऱ्यावर नेहमीच स्मितहास्य, सतत धावपळ, आवाजातील मार्दव, अभ्यासू वृत्ती, संगित व वाचनाची आवड, नव्याचा ध्यास, नवनवीन ब्रॅंडच्या कपड्यांची व गाड्यांची आवड, चांगल्याला चांगले म्हणण्याचा मनाचा मोठेपणा, मैत्री जोडण्याची आणि जपण्याची खास आवड, धंद्यासाठी कितीही कष्ट घेण्याची तयारी. यशस्वी उद्योजक आहे म्हणून वेगळी वागणूक मिळावी अशी अपेक्षा न करणारा, निर्भिड, स्पष्टवक्ता, कार्यक्रमात बोलायला बिचकणारा , मोकळ्या मनाचा आणि घरात सर्वांचा लाडका असे विविध पैलू राहुलच्या अंगी होते.
एकमेकांची मनं जुळली की कधी शाब्दिक, वैचारिक वाद नाहीत. संगणकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर तो लीलया करत असे. विशेष म्हणजे हे ज्ञान स्वतःपुरते मर्यादित न ठेवता सर्वांना देण्यात आनंद मानत असे. राहुलच्या अकाली जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झालीय. सर्वांच्या मनातला राहुल आता या जगात नाहीये हे जरी सत्य असले तरी ते स्वीकारणे अवघड आहे. राहुल जातानाही अनेकांना खूप मोठा संदेश देवून गेलाय.