(रत्नागिरी)
शिक्षणासाठी नाणीज येथे आलेल्या एका १७ वर्षीय कॉलेज विद्यार्थ्याने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी एक वाजता घडली. सतत मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादामुळे त्याला मानसिक अस्वस्थता आणि नैराश्याने ग्रासल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मयताचे नाव रविंद्र राजेंद्र बेंद्रे (वय १७, रा. नेवासा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आहे. तो नाणीज येथे आपल्या मावस भावाकडे राहण्यास आला होता. गेल्या वीस दिवसांपासून तो कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मात्र, त्याला मोबाईल गेमिंगचे व्यसन लागले होते. यामुळे तो अस्वस्थ राहत होता, अशी माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली.
सोमवारी दुपारी नाणीज येथील राहत्या खोलीत लोखंडी अँगलला टॉवेल बांधून त्याने गळफास घेतला. त्याला तातडीने खाली उतरवून पाली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २९४ अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.