(मुंबई)
सध्या शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण राज्यात ऑपरेशन टायगर सुरु केले आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाने कोकणात उबाठा गटाला खिंडार पडले आहे.
दरम्यान, आज शिवसेना उपनेतेपदी माजी आमदार संजयराव कदम यांची तर विधानसभा क्षेत्रप्रमुखपदी किशोरभाई देसाई यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते रामदासभाई कदम, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेशदादा कदम, माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी (दि.१८ मार्च) मुंबई येथील विशेष कार्यक्रमात देण्यात आले.
दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले आहेत. कोकणात शिवसेना प्रभाव वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहेत. कोकणी जनतेने बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर नेहमीच प्रेम केले. मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम कोकणात काम करत आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मागील पंचवीस वर्ष कोकणात काम केले. आता संपूर्ण कोकण शिवसेनामय झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकणातील भूमीपूत्रांना तिथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असेही ते पुढे म्हणाले. शिवसेनेचे दोन कदम एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा “दम” राहणार आहे. काम करणारा कार्यकर्ताही उबाठामध्ये राहणार नाही, तो शिवसेनेमध्येच येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.