(विशेष/ प्रतिनिधी)
जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त पदावर चिकणे यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी दिपक घाटे रुजू झाले. घाटे यांनी रत्नागिरी समाज कल्याण विभागाचा सहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. मात्र घाटे यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेले विविध कारनामे उघड होताच रत्नागिरी जिल्ह्यात आता खळबळ माजली आहे. सध्या रत्नागिरी समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असलेले घाटे हे वादग्रस्त अधिकारी म्हणून संपूर्ण राज्याला परिचयाचे आहेत. या वादग्रस्त अधिकाऱ्याची अनेक प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. परंतु जिल्ह्याच्या महत्वाच्या पदाची धुरा वादग्रस्त अधिकाऱ्याकडे सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रत्नागिरी समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणारे घाटे हे सोलापुर येथील 5 कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती अपहार प्रकरणात दोषी सापडले, सांगलीतील त्यांची वादग्रस्त कारकीर्द आणि कोट्यवधीच्या मालमत्ता प्रकरणी वादात सापडलेल्या अधिकाऱ्याची जिल्ह्यात महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली हे दुर्दैव म्हणावे लागेल. वादग्रस्त अधिकारी घाटे यांच्या विरोधात दिनांक 17 मार्च 2025 रोजी कोल्हापूर येथील दलीत मित्र संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रत्नागिरी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामधील सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले श्री दिपक घाटे यांची चौकशीअंती निलंबित करून कारवाई करण्याबाबतचे निवेदन दलीत मित्र संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनाने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र या अधिकाऱ्याचे मागील कारकिर्दीतील कारनामे गाजलेले असतानाही रत्नागिरी समाज कल्याण विभागाचे महत्वाचे पद दिले कसे? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. याकडे रत्नागिरी पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. असे वादग्रस्त अधिकारी आयात करून जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळन्यापूर्वीच पालकमंत्री या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागासवर्गियांकरीता विविध कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोचविणे, तसेच बहुताय महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे अशा बाबी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील समाजकल्याण कार्यालयामार्फत राबविल्या जातात. याबाबतची अंमलबजावणी करणेची संपूर्ण जबाबदारी जिल्हयाच्या विभाग प्रमुखाकडे असते. परंतु विशेष सहाय्य विभागामध्येच सहाय्यक आयुक्त दिपक घाटे हे कायदा सुव्यवस्था बिघडवत असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची प्रतिमा जनमानसात मलिन करत आहेत. आपल्या अधिकारपदाचा वापर जनहितासाठी न करता स्वतःचे हित जोपासत आहेत. माणूकसकीला काळीमा फासण्याचे कृत्य करत आहेत. कार्यालयात कामकाजापेक्षा बाहेरील इतर कामात लक्ष घालत आहेत. त्याचप्रमाणे महिलांचा अपमान करणारे अधिकारी सुध्दा या कार्यालयामध्ये आहेत त्यांची कसून चौकशी व्हावी. रत्नागिरी येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पदावर कार्यरत असणारे श्री दिपक घाटे यांची कारकिर्द नेहमीच चर्चेत व संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. त्यामुळे त्यांचेवर वारंवार तक्रारी वाढत आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.
निधी हडप करून मोठा भ्रष्टाचार
तसेच कोल्हापूर जिल्हयातील त्यांची कारकिर्द खूपच भ्रष्टाचाराची व इतरांना त्रासदायक ठरलेली आहे. मागासवर्गिय दलित वस्तीतील निधी हडप करून मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्यामधील रस्त्यावरील पोलसहीत एलइडी बसवलेल्या कामात मोठा भ्रष्टाचार केला आहे. परंतु त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यांना मंजूरीपेक्षा जादा निधी म्हणजे २२.५० लाख रूपये दाखवला आहे. त्यांची खारतजमा करून चौकशी अहवाल मा एस कार्तिकेयनसाो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद कोल्हापूर यांचेकडे गेला असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. यामध्ये प्रशासनाने कोणतीही कारवाई न करता यामध्ये कोणाचे हित जोपासले आहे किंवा प्रशासन कोणाला पाठिशी घालत आहे याची सखोल चौकाशी होणे गरजेचे आहे. जे अधिकारी प्रशासकीय चौकशी सुरू असताना कोणत्याही पदभार सांभाळत आहेत त्यांना या पदावरून पदमुक्त करणे गरजेचे होते. अशा व्यक्तीला प्रशासनापासून दूर ठेवून त्यांच्यावर योग्यती कारवाई होणे गरजेचे आहे.
…तीव्र आंदोलनाचा इशारा
मागासवर्गीय योजनात भ्रष्टाचार करणाऱ्या कलंकित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा. तसे न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा व न्याय मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करून साखळी उपोषण करण्यात येईल, अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून गोरगरीब जनतेला न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणेत येईल, असा थेट इशारा दलीत मित्र संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुर्यकांत यादव महापुरे यांनी प्रशासनाला दिला आहे.