(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे फणसवळे गावातील एका आंब्याच्या बागेत सात वर्षांचा नर जातीचा बिबट्या थेट फासकी तोडून दमलेल्या स्थितीत एका ठिकाणी बसलेला ग्रामस्थांना आढळून आला. मात्र या बिबट्याचा दुर्दैवाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी, दिनांक 16 मार्च 2025 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या मौजे फणसवळे (ता जिल्हा रत्नागिरी) येथील श्री भगवान श्रीपत पाटील यांच्या आंबा कलमाच्या बागेत गुरखा फेरी मारत असताना बिबट्या जातीचा वन्यप्राणी फासकी तोडून फासकीसहित बागेत बसलेला दिसून आला. याबाबत सकाळीच तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. वनविभागाचे वनपाल पाली, वनरक्षक जाकादेवी, यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता बसलेल्या बिबट्याच्या कमरेला फासकी लागलेली दिसून आली. बसलेला बिबट्या फासकी तोडून आलेल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. तसेच बिबट्या हा मोठमोठ्याने धापा टाकत असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर निपचित त्याजागेवर पडला.
दाखल झालेल्या वन अधिकाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यू टीम व पिंजरा बोलवून घेतला. पोलिसांच्या माध्यमातून ग्रामस्थांना बाजूला करण्याचे काम करून, पिंजरा व जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध झाला. थोडय़ा वेळानंतर बिबटय़ाचा मृत्यू झाला. येथील आंबा कलम बागेला सभोवर दगडी बांध असून त्यावर काटेरी कुंपण आहे.
वनविभागाकडून गुन्हा नोंद
फासकीत सापडलेला बिबट्या मृत झाल्याने रत्नागिरी येथील झाडगाव पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करण्यात आले. मृत बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सात वर्षे वयाचा होता. मृत शरीर सर्व अवयवासहित जाळून नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी वनविभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची फासकी कोठे व कोणी लावली याबाबत वन अधिकारी शोध घेत आहेत.
अशा प्रकारांबाबत वनविभागाला तत्काळ माहिती द्या…
ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी चिपळूण प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी एएसआय श्री सावंत, पोलीस हवालदार श्री भाटले , होमगार्ड पालवे मॅडम, श्री पालते व श्री नाखरेकर यांचे तसेच स्थानिक ग्रामस्थ पोलीस पाटील सुजाता आंबेकर यांचे सहकार्य लाभले. हे काम परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक जाकादेवी शर्वरी कदम, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे, रेस्क्यू टीम अनिकेत मोरे, महेश धोत्रे आदी उपस्थित होते. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाला तात्काळ कळविण्यासाठी वन विभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या नंबर वर माहिती द्यावी. असे आवाहन गिरिजा देसाई (विभागीय वनअधिकारी रत्नागिरी) यांनी केले आहे.