(रत्नागिरी / प्रतिनिधी)
टाटा मोटर्स व बी.व्ही. जी. फाउंडेशन यांनी संयुक्तिक रस्ता सुरक्षा वाढीच्या दृष्टिकोनातून नवीन अँप्लिकेशन तयार केले आहे. या अँप्लिकेशनला “गुड समॅरिटन रस्ता सुरक्षा अँप” असे नाव देण्यात आले आहे. हे अँप्लिकेशन नागरिकांच्या सेवेत सज्ज झाले असून रत्नागिरीतील स्वरूपानंद विद्यामंदिर, पावस येथे जनजागृती कर्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. माने सर व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
१३ मार्च, राष्ट्रीय गुड समॅरिटन दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांमध्ये अपघातग्रस्तांना मदत करण्याची सद्भावना जागृत करणे, प्राथमिक उपचार करणे, त्यांची काळजी घेणे तसेच या अँप्लिकेशनचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती अभियान बी.व्ही. जी. फाउंडेशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. तसेच पूर्ण राज्यभरामध्ये 27 ठिकाणी समॅरिटन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अंदाजे दीड हजार लोकांना याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.
उच्च तंत्रज्ञान व सामान्य जनतेकडून केली जाणारी अपघात प्रसंगी कृती यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिली जाणारी मदत वाढविणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. रस्ते अपघातातील जखमींपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये वैद्यकीय मदत पोहचण्यासाठी सध्याच्या १०८ रुग्णवाहिका पाठविण्याच्या कार्य प्रणालीमध्ये या अँप्लिकेशनचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे.
गुड समॅरिटन म्हणजे काय?
सद्भावनेने प्रेरित होऊन अपघात किंवा एखाद्या दुर्घटनेतील जखमी व्यक्तीला मदत करणारा स्वयंसेवक. भारतात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. अशातच कायदेशीर कटकटींना घाबरून लोक मदतीस पुढे येत नाहीत व त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होतो. यासाठीच सन २०१६ मध्ये गुड समॅरिटन कायदा लागू करण्यात आला, त्यामुळे सामान्य लोकांना प्राथमिक उपचारामध्ये बाधा न आणता मदत करणाऱ्यास कायद्याचे संरक्षण मिळाले.