(रत्नागिरी)
जिल्ह्यामध्ये सन 2023- 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये कंत्राटी तत्त्वावरती 672 शिक्षकांची नियुक्ती जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी केली होती. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शाळा उघडण्यासाठी शिक्षकही उपलब्ध नव्हते, अनेक शिक्षकांच्या जिल्हा बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे येथील शैक्षणिक व्यवस्था बिघडली होती. ही शैक्षणिक परिस्थिती टिकवण्याचं काम स्थानिक डीएड बीएड धारक आणि पदवीधर शिक्षक यांनी केले होते, त्या सर्व शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कार्यमुक्त करण्यात आले आहे.
सन 2024 -25 या शैक्षणिक वर्षात 23 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 495 शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. शासनाने 10 फेब्रुवारी 2025 रोजी घेतलेल्या शासन निर्णयाप्रमाणे या सर्व शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत. हे सर्व शिक्षक बेरोजगार होणार आहेत. ज्या शिक्षकांनी जिल्ह्याची शैक्षणिक व्यवस्था वाचवली, अशा शिक्षकांवर उपासमारीची वेळ येत असल्याकारणाने कंत्राटी शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 17 मार्च 2025 रोजी धरणे आंदोलन करणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा हा डोंगराळ व अति दुर्गम भागामध्ये वसलेला आहे. या जिल्ह्यातील अनेक शाळा ह्या वाडीवस्तीवर डोंगराळ भागात आहेत त्यामुळे या शाळेतील मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर कंत्राटी शिक्षक शासन निर्णय रद्द झाल्यामुळे मोठा परिणाम होणार आहे. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. अनेक शाळा शून्य शिक्षिकी आहेत. दरवर्षी या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीने जाणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे इथल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोकणातील डोंगराळ भागाचा विचार करता तात्काळ पर्यायी शैक्षणिक व्यवस्था म्हणून कंत्राटी शासन निर्णय हा उत्तम पर्याय आहे, यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे. कंत्राटी शिक्षक भरतीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला याचा मोठा फायदा झाला आहे. छोट्या छोट्या शाळातील मुलांच्या प्रगतीवर याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे हा शासन निर्णय टिकला पाहिजे. नियुक्ती दिलेल्या सर्व 495 शिक्षकांना कार्यमुक्त न करता कायम ठेवण्यात यावे, अशी कंत्राटी शिक्षकांची मागणी आहे.
कंत्राटी शिक्षक भरती शासन निर्णयाचा पुनर्विचार करून हा शासन निर्णय पुनर्जीवीत करावा. या मागणीसाठी 17 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी शिक्षक डीएड बीएड धारक धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करणार असून या आंदोलनात 500 शिक्षक सहभागी होणार आहेत.
कंत्राटी शिक्षक संघटना जिल्हा
अध्यक्ष – सुदर्शन मोहिते.
अजिंक्य पावसकर (संगमेश्वर) संजय कुळये (रत्नागिरी) गिरीश जाधव (रत्नागिरी) रुपेश झोरे (लांजा) मृदुला देसाई (लांजा) विनोद कांबळे ( राजापूर) शेफाली पेणकर (राजापूर) प्रज्ञा कदम (चिपळूण) अमोल सावर्डेकर (चिपळूण) रुपाली वाघे (गुहागर) सुशांत मुंडेकर (गुहागर) योगेश तांबे ( खेड) श्रेया कापसे ( खेड) आरती तांबे ( दापोली) प्रिया गमरे (मंडणगड)