(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या रवि इफ्रा या ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. खेडशी भागात महामार्गाने येथील व्यवसायिक, घरांची वाट रोखून धरली असल्याने लोकांनी ये-जा करावी कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गावरील धुळीने हैराण झालेल्या नागरीकांना आता वेगवेगळ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या भागात व्यावसायिक तसेच काही स्थानिक नागरिक राहतात. भूसंपादनामुळे बाधित झालेल्या नागरिकांना-व्यवसायिकांना भूसंपादन कायदाप्रमाणे काहींना जमीनीचा मोबदला मिळाला असून काहींना अद्याप ही प्रशासनाकडून मोबदला दिला गेला नसल्याची माहिती स्तानिकांकडून देण्यात आली आहे. प्रशासनाकडून अधिग्रहण केलेल्या सर्व जमीन धारकांना मोबदला देऊन सर्व भागाचे काम एकमार्गी पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र ठेकेदार कंपनीने कामाला सुरुवातही केली असून ठेकेदार रवी इंफ्रा कंपनीने येथील कातळ भागाची खोदाई करून २० ते २५ फुटांची दरी निर्माण केली आहे. येथे अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?
यापूर्वी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा असलेला रस्ताच ठेकेदार कंपनीने खोदाई करून शिल्लक ठेवला नसल्याचे चित्र आहे. या भागातील नागरिकांना सर्विस रोड देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे मात्र तो रस्ता होईल तेव्हा त्यावरून मार्गक्रमण करता येईल. सध्या या नागरीकांना गैरसोय होत आहे त्याकडे लक्ष कोण देणार? ठेकेदार कंपनीच्या अधिकारी , अभियंत्यांनी भान ठेवून कामे करण्याची मागणी नागरकांमधून केली जात आहे. लोकांच्या गैरसोयी दूर करताय की अडचणी निर्माण करताय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
रस्ता झाला छोटा भिंत झाली मोठी
ठेकेदार कंपनीमार्फत या भागात रस्त्याच्या बाजूचा कातळ भाग पोलकेनद्वारे खोदून भिंत निर्माण करण्यात आली आहे. मात्र या वीस ते पंचवीस फुटाच्या भिंतीमुळे व्यवसायिकांचे व्यवसाय धंदे ठप्प झाले असल्याने अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे. एकूणच नागरिक व्यवसायिक अडकून पडले आहेत. अशाच मनमानी पद्धतीने महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इफ्रा ठेकेदार कंपनीचे एक एक नमुने आता बाहेर येण्याची शक्यता आहे.