(रत्नागिरी)
मूल होत नाही यावरून हिणविण्याच्या रागातून पाच वर्षांच्या चिमुरडीचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार कसलये-तिस्क फोंडा (गोवा) येथे हा घडल्याचे समोर आले आहे. खुनानंतर घराच्या बाजूला मृतदेह दफन करण्यात आला. दफन केलेल्या मयत मुलीचे नाव अमेरा ज्युडान अन्वारी (वय ५) असे असून, ती मूळ रत्नागिरी शहरातील राजीवडा येथील आहे. कौटुंबिक कारणावरून आईसह ती आणखी एका बहिणीसह आजीकडे गोव्याला राहात होत्या. या प्रकरणी गोवा पोलिसांनी संशयित पती-पत्नीला अटक केली असून संशयित महिला सांगली जिल्ह्यातील असल्याचे समजते.
बाबासाहेब ऊर्फ पप्पू अल्हाट (वय ५३) आणि पत्नी पूजा अल्हाट (वय ३९, रा. फोंडा, मूळ सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित दाम्पत्याचे नाव आहे. बाबासाहेब (५३) हा मूळ औरंगाबाद येथील आहे, मात्र त्याचा जन्म गोव्यातच झालेला असून व्यवसायाने तो वेल्डर आहे. तर पूजा (३९) ही मूळ सांगली येथील असून २०१० पासून ती गोव्यात राहत आहे. या जोडप्याला संततीप्राप्ती नाही. बुधवारी (ता. ५) रोजी अमेरा बाहेर बागडत असताना तिला पूजा हिने उचलून घरी नेले व नंतर तिला टबमध्ये बुडवून ठार मारले. बाहेर कुठेतरी तिला पुरून टाकण्याच्या प्रयत्नात ते होते. मात्र तोपर्यंत ती बालिका बेपत्ता असल्याची तक्रार फोंडा पोलिस ठाण्यात नोंद झाल्याने, पोलिस तपासकामासाठी त्या मुलीच्या घराजवळ आले होते. आपले बिंग फुटेल म्हणून संशयितांनी त्या चिमुरडीला घरातच खड्डा खोदून पुरले. दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने तपास सुरू केला. यात अल्हाट दांपत्यावर संशय बाळावल्याने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. शवचिकित्सेनंतर मृतदेह मयताच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
चिकित्सा अहवालात नाका तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. पप्पू आणि त्याची पत्नी पूजा या दांपत्याला मूलबाळ नाही. त्यामुळे मूलबाळ होण्याबरोबरच समृद्धी मिळावी, या हेतूनेच हा “नरबळी” दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र नरबळी व संततीप्राप्तीसाठी हा खून झाल्याची शक्यता पोलिस अधीक्षक वर्मा यांनी नाकारली आहे. पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पतीच्या मदतीने चिमुरडीचा कायमचा काढला काटा
अमेराची आई लग्न करून रत्नागिरीला दिलेली होती. आमेरा आपल्या आईसमवेत राहत होती. पण नवरा मारझोड करीत असल्याने वर्षभरापूर्वीच ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी रहायला आली होती. त्यांच्या घरासमोरील सुमारे ५० मीटर अंतरावरील अल्टाट कुटुंबीयाच्या घरी त्यांची ये-जा होती. मात्र पूजा आणि मयताची आई यांच्यात भांडण झाले होते. ती पूजाला नेहमी वांझ म्हणून हिणवत होती. पूजाच्या डोक्यात हा राग खदखदत होता. त्याचा बदला घेताना तिने आपला पती बाबासाहेब याच्या मदतीने त्या चिमुरडीला पळवून नेऊन तिचा कायमचा काटा काढल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.