(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रत्नागिरीसह साखरपा पट्ट्यात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे ऍलर्जी होऊन नागरिकांना दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागत आहेत.
चौपदरीकरणाचे काम मिऱ्या ते आंबा घाटापर्यंत सुरू आहे. मात्र मिऱ्यापासून हातखंबापर्यंत सुरू असलेल्या कामामुळे अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. हातखंबा तीन तिठ्यामध्ये सध्या मिऱ्या-नागपूर महामार्ग, आणि मुंबई गोवा महामार्ग अशा दोन्ही रस्त्यांचे काम चालू आहे. येथे मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या ईगल कंपनीने काँक्रीटीकरणाची मार्गिका तयार केली आहे. तर रवि ईफ्रा या कंपनीने ग्रॅन्युलर सब-बेस थर (GSB) किंवा ड्राय लीन कॉंक्रिटचा (DLC) थर टाकून कालावधी उलटला तरीही अर्धवट काम ठेवल्याचे दिसून येत आहे. अशाच पद्धतीने ठेकेदार कंपनीकडून ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत कामे ठेवली जात आहेत. काही भागात काँक्रीटीकरणाची मार्गिका तयार करून त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खेडशी स्टॉप ते महालक्ष्मी, कारवांचीवाडी ते रेल्वे स्टेशन स्टॉप, डी-मार्ट समोर शंभर फुटाचा भाग, हिरो शोरूमसमोरील अंदाजे पन्नास फुटांचा भाग अशा काही भागात तुकड्यात मार्गिका तयार करण्यात आल्या असून उर्वरित भागात खोदून ठेवलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांचा जीव टांगणीला लागत आहे. मात्र संबधित ठेकेदार कंपनी वाहतूक व्यवस्थेशी कसलेही देणेघेणे नसल्यासारखे वागत आहे.
तीन सत्रात पाणी मारणे आवश्यक
ठेकेदार रवी इन्फ्रा कंपनीकडून आपल्या सोयीनुसार पाणी मारले जात आहे. तर काही वेळेला रस्त्यावर पाणीही मारले जात नसल्याने प्रचंड धुळीचे लोट वातावरणात मिसळत असतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन सत्रात रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक आहे मात्र त्याकडे ठेकेदार कंपनीमार्फत कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे. याकडे संबधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून स्थानिक आमदार महोदयांकडून ही चुकार शब्द काढला जात नसल्याने नागरिकांमधून आच्छर्य व्यक्त केले जात आहे.
ठेकेदार कंपनीची कानउघडणी कधी?
सर्विस रोडवर खोदून ठेवलेल्या रस्त्यांवर पाणी मारत असल्याने मातीचा रस्ता टणक बनला आहे. अशा टणक झालेल्या रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालकांचे मणके चांगलेच ढिले केले आहेत. या खड्डेबंबाळ मातीच्या रस्त्यामधून गाडी चालवणे नकोसे झाले आहे. खोदून ठेवलेल्या रस्त्यांवरील उसळणारी धूळ वाहनचालकांसह प्रवाशांनाही कमालीची डोकेदुखी ठरत आहे. परंतु निर्माण केलेल्या अनेक समस्या, प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदार रवि ईफ्रा कंपनीची कानउघडणी प्राधिकरण विभागाचे अधिकारी करनार आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुळीने सर्वच बेजार
उसळणाऱ्या धुळीने वाहनचालक, पादचारी तसेच दुकानदार हैराण झाले आहेत. वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या कामामुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या छोटे-मोठे व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. रस्त्यामुळे काही व्यवसायिकांनी आपली दुकानेही उठवली आहेत. अशा सर्व स्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होऊन व्यवसायिकांसमोर चिंता उभी राहिली आहे.